केंद्राच्या योजना आणून विकास करू -खा. मेंढे

0
14

अर्जुनी मोरगाव,दि.26ः-गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकर्‍यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्‍वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले.
अर्जुनी मोरगाव येथील वात्सल्य सभागृहात शुक्रवारी (दि.२४) आयोजित सत्कार सभारंभात ते बोलत होते. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी ते आले होते. ढोल-ताशाच्या गजरात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. वात्सल्य सभागृहात एका सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे, पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, नगरसेवक देवेंद्र टेंभरे, उमाकांत ढेंगे, प्रकाश गहाणे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
मेंढे म्हणाले, लोकसभेची निवडणूक एक परीक्षा होती. त्या परीक्षेत मतदारांच्या आशिर्वादामुळे आपण उत्तीर्ण झालो. हे जनतेचा आशिर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षे कुठलीही रजा न घेता देशासाठी जे काम केले त्याची ही पावती आहे. मी नेता नाही, यापूर्वी कुठलीही आमदारकीची निवडणूक लढलो नाही. केवळ भंडारा नगरपरिषदेचा अध्यक्ष आहे. वंशपरांपरागत राजकीय वलय नसताना सामान्य कार्यकत्यार्पासून खासदार बनलो. मला हा बहुमूल्य सम्मान कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारांच्या आशिर्वादामुळे प्राप्त झाला.
मागील खासदारांनी पक्षाशी बेईमानी केली. दुसर्‍या पक्षात प्रवेश केला व बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढली. त्यांना आमच्या नेत्याने त्यांची जागा दाखविली. त्यांच्या कार्यकाळात विकास कामांचा जो अनुशेष होता ती व नवीन भरीव विकासाची कामे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.