जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटीबध्द – पालकमंत्री डॉ. परिणय फुके

0
15

भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

गोंदिया,दि.15 : केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून जिल्हयाचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर आपला भर आहे. या योजनांचा जिल्हयातील नागरिकांना लाभ देवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.
आज 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर राष्ट्रध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री डॉ. फुके बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी रोहन घुगे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे क्षेत्रसंचालक रामानुजम,
उपवनसंरक्षक एस. युवराज, माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री चव्हाण, श्री गाणार, श्री पठाण, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज
जागरे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त, श्री वाळके, जिल्हा‍ नियोजन अधिकारी मृणालीनी भूत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री गजभिये, जिल्हा उपनिबंधक श्री कांबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदकिशोर नायनवाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री ढोणे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राठोड, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी श्री वासनिक, शिक्षणाधिकारी श्री हिवरे, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. फुके पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून घेतला आहे. आतापर्यंत जिल्हयातील 77 हजार 464 खातेदार शेतकऱ्यांची 223 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ जिल्हयातील 1 लाख 22 हजार 142 शेतकऱ्यांना आतापर्यंत देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जसंधारण आणि मृदसंधारणामध्ये क्रांती घडून आली आहे. या अभियानाला जिल्हयात लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाल्याने मागील चार वर्षात जिल्हयातील 399 गावात 8 हजार 992 कामे पूर्ण करण्यात आली. यामधून 82 हजार 496 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून 1 लाख 64 हजार 993 हेक्टर क्षेत्र निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हयातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मागील पाच वर्षात पुढाकार घेण्यात आल्याचे सांगून डॉ. फुके म्हणाले, जिल्हयातील विविध प्रकल्पातून 14 हजार 563 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. 11 हजार 884 शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना जुलै 2019 पर्यंत वीजजोडणी देण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांची शेती संरक्षित सिंचनाखाली आल्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. धडक सिंचन विहीरी कार्यक्रमाअंतर्गत 2 हजार पैकी 1979 विहीरी पूर्ण झाल्यामुळे नव्याने 1184 हेक्टर संरक्षित सिंचनक्षमता निर्माण झाल्यामुळे संबंधित
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थीती सुधारण्यास मदत झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून 15 हजार 967 तर रमाई, शबरी आणि इंदिरा आवास योजनेतून 21 हजार 141 घरकुलाची कामे पूर्ण झाल्यामुळे लाभार्थ्यांचे घर बांधण्याचे स्वप्न शासनाने पूर्ण केल्याचे ते म्हणाले.

डॉ. फुके पुढे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चार वर्षात जिल्हयातील 430 किलोमीटरची ग्रामीण रस्त्यांची 81 कामे पूर्ण करण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतूकीची चांगली सुविधा निर्माण झाली आहे. जिल्हा हागणदारी मुक्‍त झाला असून नादुरुस्त असलेली 41 हजार 797 शौचालय दुरुस्त करुन वापरात आणण्यात यश आले आहे. जिल्हयातील मजूरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना जिल्हयासाठी महत्वाची ठरली आहे. या योजनेतून पाच वर्षात 6 लाख 89 हजार 729 कुटूंबाना रोजगार पुरविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असल्याचे सांगून डॉ. फुके म्हणाले, मागील पाच वर्षात शासनाने 1759 कोटी 96 लक्ष रुपयांची धान खरेदी करुन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. या धान उत्पादक शेतकऱ्यांना 212 कोटी 62 लक्ष बोनस दिला आहे. वनहक्क कायदयाचे जिल्हयात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून 856 सामूहीक वनहक्क दावे मान्य करुन 98 हजार 555 हेक्टर तर 8 हजार 500 वैयक्तिक दावेदारांना 12 हजार 64 हेक्टर वनक्षेत्र त्यांच्या उपजिविकेसाठी वाटप करण्यात आले आहे. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा 556 शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. 50 कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्हयात 1 कोटी 39 लाख 93 हजार वृक्षांची लागवड करण्यात आल्याचे ते म्हणाले. डॉ. फुके पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हा हा नैसर्गिकदृष्टया समृध्द आहे. जिल्हयात पर्यटन स्थळे, तीर्थस्थळे, वन्यजीव व स्थलांतरीत पक्षी मोठया प्रमाणात आहे. जिल्हयाचे वैभव असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पासोबतच जिल्हयातील अन्य पर्यटन स्थळांचा विकास करण्यासोबतच जास्तीत जास्त पर्यटक जिल्हयात कसे येतील व त्या माध्यमातून स्थानिकांना मोठया प्रमाणात रोजगार कसा उपलब्ध होईल. यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रारंभी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले व मानवंदना स्विकारली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तसेच विविध क्षेत्रातील
व्यक्तींचा सत्कार केला. परेडमध्ये पोलीस महिला-पुरुष, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र योजना, स्काऊड गाईड, श्वानपथक, बँडपथक यांचा सहभाग होता. कार्यक्रमाला विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मंजूश्री देशपांडे यांनी मानले.