तिरोडा,दि.6- : आदर्श शिक्षक म्हटले की साने गुरूजी आठवतात. शिक्षकी पेशाला मोठी परंपरा आहे. आज जगात ज्ञानाची क्रांती झाली असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या अनेक समस्या असल्या तरी त्यावर मात करून त्यांनी आपले काम योग्य प्रकारे करावे, अशी अपेक्षा सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्त व आदर्शशिक्षकांचा सत्कार समारंभ सोमवारी शिक्षक दिनानिमित्त स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आ.विजय रहांगडाले यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ना.बडोले बोलत होते. आ.विजय रहांगडाले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले होते. यावेळी आ.गिरीष व्यास,माजी आमदार हेमंत पटले, माजी आ.भजनदास वैद्य, हरिष मोरे, पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, जि.प.सदस्य रजनी सोयाम, विश्वजित डोंगरे,सभापती दिलीप चौधरी,उपसभापती बबलू बिसेन, पवन पटले, रमनिक सोयाम, हितेंद्र लिल्हारे, माधुरी टेंभरे आदी मंचावर विराजमान होते.
अध्यक्षीय मार्गदर्शनात खा.पटोले म्हणाले, आजच्या स्थितीत आपण विचार केला असता भंडारा व गोंदिया जिल्हा शिक्षणात मागे पडला आहे.शिक्षणात खूप मोठे बदल होत आहेत. शिक्षण प्रणालीत झालेले बदल लक्षात घेऊन शिक्षकांनी शिकविले पाहिजे.
धापेवाडा टप्पा-१ व २पूर्ण झाले पाहिजे. अजूनही तलावात पाणी पडले नाही. त्यामुळे शेतात पाणी पोहोचू शकले नाही. वैनगंगेचे पाणी शेतात आलेच पाहिजे. लवकरच खळबंदा तलावात पाणी पडेल. काही विभागाच्या परवानग्या बाकी होत्या त्या प्राप्त झालेल्या आहे. अदानी प्रकल्पाने मात्र स्थानिकांचा नोकर्याबाबत अपेक्षाभंग केला, असे ते म्हणाले.
आ.विजय रहांगडाले यांनी आपल्या प्रास्ताविकातून या कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला.विकास कामे केलीत, न.प.ला ९ कोटी विकासासाठी आणून दिले. शिक्षकांच्या माध्यमातून शासकीय विविध योजनांची खेड्यापर्यंत पोहचवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून गुरूचे ऋण आपण कधीच विसरू शकत नाही असे त्यांनी सांगितले. संचालन माजी जि.प.उपाध्यक्ष मदन पटले यांनी तर आभार प्रदर्शन अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कृऊबासचे मुख्य प्रशासक डॉ.चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ.वसंत भगत, संजू बैस, भाऊराव कठाने, पिंटू रहांगडाले, चत्रुभूज बिसेन, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्यकेले.
शिक्षक दिनानिमित्त सेवानिवृत्त व आदर्श शिक्षकांचा गौरव
आज जिल्हा परिषदेत ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारांचे वितरण
गोंदिया,दि.6- आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांचा जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात आज ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, मुकाअ व जि.प.च्या इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून दरवर्षी शिक्षकदिनी जिल्हास्तरिय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देण्यात येतात. यासाठी प्रत्येक पंचायत समितीमधून प्राथमिक व माध्यमिक गटातून प्रत्येकी एका शिक्षकाची यासाठी निवड केली जाते.यावर्षी ९ पुरस्कारांसाठी शिक्षकांनी अर्ज केले आहेत.
आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेल्यांमध्ये प्राथमिक विभागात गोंदिया तालुक्यातून सुनंदा रमेश ब्राम्हणकर, जि.प. पूर्व माध्यमिक शाळा अर्जुनी यांची निवड झाली आहे. आमगाव तालुक्यातून सुरेश फोगल कटरे, जि.प. वरिष्ट प्राथमिक शाळा पिपरटोला, सालेकसा तालुक्यातून राधेश्याम गेंदलाल टेकाम, जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा पांढरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातून अशोक श्रावण नाकाडे, मुख्याध्यापक जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा चान्ना-बाक्टी, सडक-अर्जुनी तालुक्यातून उत्तम केवळराम बन्सोड, जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा धानोरी, गोरेगाव तालुक्यातून हरिराम केशव येळणे जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळा जानाटोला तर सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार आमगाव तालुक्यातील पुष्पलता लोकचंद क्षीरसागर, जि.प. प्राथमिक शाळा ढिवरटोला यांना देण्यात आला.माध्यमिक विभागातून सालेकसा तालुक्यातून जि.प. हायस्कूल कावराबांध येथील भुवनेश्वर बंडूजी सुलाखे तर सडक-अर्जुनी तालुक्यातून जि.प. हायस्कूल सडक-अर्जुनी येथील दुधराम पांडुरंग डोंगरवार यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत
सिल्लोडजवळ पूल कोसळला; चार जखमी
सिल्लोड (जि. औरंगाबाद), ता. 5 ः सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील पूल कोसळून दोन मोटारसायकलींवरील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. महाड दुर्घटना ताजी असतानाच सिल्लोड तालुक्यातील पूल कोसळल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सिल्लोड शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर साधारण पंधरा फूट उंचीचा पूल अचानक मधोमध कोसळला. पुलावरून जाणाऱ्या दोन मोटारसायकली पडल्या. या घटनेत अजय बैनाडे (रा. बोरगाववाडी, ता. सिल्लोड), आरती बारवाल (रा. अन्वा, ता. भोकरदन), बाळू आनंद पंडित व गोविंदा तुकाराम पंडित (दोघे रा. मोढा खुर्द, ता. सिल्लोड) हे जखमी झाले.
सिल्लोडकडून म्हसला टाकळीकडे एक बस जात होती. ही बस पुलापासून थोडी दूर होती. यात 25 प्रवासी होते. बसचालक वसंत गावंडे व वाहक पंढरीनाथ सपकाळ यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलविले. पूल कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. एसटी महामंडळाने या मार्गावरील सर्व गाड्या रद्द केल्या आहेत. हा पूल 40 वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे.
शास्त्री वॉर्ड ओबीसी संघर्ष समिती अध्यक्षपदी खुशाल कटरे, कार्याध्यक्ष प्रा.गहाणे, तर सचिव बंशीधर शहारे
गोंदिया: गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने शास्त्री वॉर्ड गोंदिया येथील रामकृष्ण गौतम यांच्या निवासस्थानी रविवारला घेण्यात आलेल्या बैठकीत शास्त्री वॉर्ड ओबीसी संघर्ष कृती समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते. यावेळी कार्याध्यक्ष अमर वèहाडे, उपाध्यक्ष मनोज मेंढे, संघटक कैलास भेलावे, संयोजक खेमेंद्र कटरे, शिशिर कटरे, सावन डोये,डी.डी. पटले उपस्थित होते. यावेळी शास्त्री वॉर्ड ओबीसी कृती समितीच्या अध्यक्षपदी प्रा.खुशाल कटरे, कार्याध्यक्षपदी प्रा. रामलाल गहाणे व सचिव पदावर बंसीधर शहारे यांची निवड करण्यात आली. कोशाध्यक्ष पदी बी.डब्ल्यू.कटरे व ओमप्रकाश शेंडे, सहसचिव यशवंत भगत व अरुणराव रहमतकर, उपाध्यक्षपदी एस.यू.वंजारी, व कृष्णकुमार लिल्हारे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून गजानन तरोणे व विजय मुनेश्वर, तर सदस्यांमध्ये छत्रपती कटरे, रामकृष्ण गौतम, खोमराज बिसेन, वाय.डी. पटले, मुरेश्वर बडवाईक, विनोद चौधरी, संतोष वैद्य, दिवाकर बिसेन, राजेश कापसे, सुनील भोंगाडे, भाऊराव नागमोती, गोविंद बुरडे, पद्माकर गायधने, पी.वाय.ठाकरे, तेजराम पारधी यांचा समावेश आहे. तर सल्लागार समितीमध्ये सेवानिवृत्त तहसीलदार भरत पाटील, सेवानिवृत्त एएसआय भिवाजी खुने, राधेश्याम करंजेकर, सुरेश गायधने, सेवानिवृत्त अभियंता झेड.पी. रहांगडाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी.आर. उरकुडे, अनिल टेंभरे व डॉ. रुपसेन बघेले यांचा समावेश आहे. या बैठकीत अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पुढच्या बैठकीत महिला ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी विद्यार्थी संगठना गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच कोपर्डी घटनेसह इतर मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. यावेळी योगानंद पटले, धनेंद्र चव्हाण, मनोज रहांगडाले, जीवन शरणागत आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील 29 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 29 शिक्षकांना सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.येथील विज्ञान भवनात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘शिक्षक दिना’निमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, उच्च शिक्षण राज्यमंत्री डॉ. महेंद्र पांडे, शालेय शिक्षण राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, शालेय शिक्षण सचिव सुभाष चंद्र खुटिया आदी उपस्थित होते.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारांची सुरूवात 1958 पासून करण्यात आली. यावर्षी देशभरातील एकूण 378 शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र, 50 हजार रूपये रोख असे आहे.महाराष्ट्रातील एकूण 29 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार – 2015 प्रदान करण्यात आले. यामध्ये 20 प्राथमिक शिक्षकांपैकी दोन शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत. नऊ माध्यमिक शिक्षकांपैकी एक शिक्षक हे विशेष श्रेणीचे आहेत.
20 प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
शर्मिला मोहन पवार (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, कुसेलवाडी, शिराळा), सुदाम ईश्वर होळमुखे, (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, कडेगाव), अनिल देवदन मोहिते (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय क्रमांक 3 इमान धामणी, मिरज), संजीव पांडूरंग चौगुले, श्रीमती एम.डी. बर्वे (प्राथमिक विद्यालय, अभयनगर, मिरज) हे सर्व शिक्षक सांगली जिल्ह्यातील आहेत.संभाजी गोंविद पाटील (केंद्रीय विद्यालय, दाजीपूर, राधानगरी), विमल गुंडूराव चौगुले (श्री शंकरलिंग विद्यामंदीर, मडिलगे, आजरा), सुहास अर्जुन शिंत्रे (जीवन शिक्षण विद्यामंदीर, वदरागे, गडहिंग्लज) सर्व शिक्षक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.दत्तात्रय बबनराव वारे (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, वाबळेवाडी, शिरूळ), सोमनाथ पांडूरंग म्हेत्रे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संगरूण, हवेली), शिवाजी दत्तू सोनावणे (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, नंदेलावले, मुळशी), हनुमंत श्रीरंग जाधव (जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय कातेवाडी, बारामती) सर्व शिक्षक हे पुणे जिल्ह्यातील आहेत.
विशेष श्रेणी अंतर्गत पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये पुणे जिल्ह्यातील शिवाजी कालूराम कलाने, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, मांडाकी, ता. पुरंदर, संदीप मुरलीधर आढाव, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, शिरसगांव, काता, शिरूळ यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यासह श्रवण वामन जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, थाळेवाडी, सीपीएस, अवहाना, (भोकरधन) जालना, प्रदीप मारोती मांजरेकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वारवाडी, क्रमांक 1 (कणकवली) सिंधुदुर्ग, मच्छिंद्रनाथ वासूदेव पाटील, पंकज प्राथमिक विद्यालय, चोपडा, बोरोले नगर क्रमांक 1 चोपडा, जळगाव, बाळासाहेब संदीपान वाघ, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, अकोले, सोलापूर, माधव पुंडलिक वैचळ, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, पिंपळखुटा, सीपीएस, बासंबा, हिंगोली, सुधाकर जगन्नाथ मडावी, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, हिरापूर, केंद्र अवलपूर, कोरपना, चंद्रपूर, नागदेव सखाराम धामणे, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय, खडकी, खंडाळा, अहमदनगर या शिक्षकांनाही राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
नऊ माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
माध्यमिक शिक्षकांमध्ये डॉली गेविन हेन्री (वाणी विद्यालय, जे.एन. रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई), पांडूरंग रंगराव संकपाल (शाहपूर उच्च विद्यालय, शाहपूर, इचलकरंजी, हातकंगले, कोल्हापूर), बिना रौनी लोबो (भारत शिक्षण सामाजिक कार्तिका, उच्च विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, न्यू हॉल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई), कमलाकर मुरलीधर महामुनी (रयत शिक्षण संस्था, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा), विठ्ठल मारोती भोर (भैरवनाथ विद्यालय डोंडे, खेड, राजगुरूनगर, पुणे), समिता गौतम पाटील (शांतीनिकेतन, माध्यमिक आणि उच्च प्राथमिक विद्या मंदीर, सांगली), नरेंद्र भागवत पाठक (एस.के. सोमय्या विनय मंदीर उच्च विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यानगरी, विद्याविहार, मुंबई), अरूण बहरजी सुलगेकर (पृथ्वीराज कपूर मेमोरियल, उच्च विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, लोणीकाळभोर, हवेली, पुणे) यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.विशेष श्रेणीअंतर्गत निवास यशवंत शेवाळे, प्रभादेव बी.एम.सी. प्राथमिक विद्यालय, मुरारी घाग मार्ग, प्रभादेवी, मुंबई यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक कटरेंचा पालकमंत्री व खासदारांच्या हस्ते सत्कार
तिरोडा,दि.५- तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्यावतीने आज (दि.5) तिरोडा येथे मतदारसंघातील आदर्श शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार कार्यक्रम शिक्षक दिनाचे औचित्य साधून करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले हे मुख्य अतिथि म्हणून उपस्थित होते.तर खासदार नाना पटोले,आमदार गिरीश व्यास,आमदार ना.गो.गाणार,माजी आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,बाजार समितीचे प्रशासक डाॅ.चिंतामण रहागंडाले, माजी आमदार हरिष मोरे,भजनदास वैद्य,गोरेगाव पंचायत समितीचे सभापती दिलीप चौधरी,उपसभापती सुरेंद्र बिसेन,जिल्हा परिषद सदस्य विश्वजित डोंगरे,पंचायत समिती सदस्य गुड्डू लिल्हारे,रजनी कुंभरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात गोरेगाव तालुक्यातील मोहगाव बु.येथील परशुराम विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.डब्लू.कटरे यांचा आदर्श शिक्षक म्हणून हायस्कूल गटातून पालकमंत्री बडोले,खासदार पटोले व आमदार रहागंडाले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रामाचे संचालन माजी जि.प.सदस्य मदन पटले यांनी केले.
पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेले रेंगेपार व सिंदपुरीवासी
तुमसर,berartimes.com दि.5:तुमसर तालुक्यातील सिंदपूरी येथील तलावाची पाळ फुटल्याने गावातील अनेक घरे भुईसपाट झाली. तर काही शेतकर्यांची शेती पडीत झाली. मागिल दोन वर्षापासून सध्या टिनाचे पत्रे व फाटक्या चटईच्या आळूशात तात्पुरता निवारा उभारण्यात आला आहे. मात्र, आजतागायत घरकुल बांधकामाकडे प्रशासनाचे तथा जनप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. तसेच रेंगेपारच्या पुनर्वसनाच्या मागणी वरून राजकीय पुढार्यांनी वैनगंगा नदी घाटात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. तेच आता खासदार व आमदार झालेत परंतु त्यांना सत्ता असतानाही पुनर्वसनाच्या प्रश्न सोडविता आला नसल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि.राजेंद्र पटले यांनी केला आहे.त्यांनी सिंदपुरी गावात पिडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेतल्यानंतर कार्यकत्यार्ंशी बोलतांनी विचार व्यक्त केले.यावेळी त्यांच्यासोबत तालुका कामगार सेना प्रमुख मनोहर जांगडे, तुमसर शहर विभागप्रमुख अमित एच. मेश्राम, योगराज टेंभरे, राज तुरकर, राकेश शरणागत, प्रकाश चौधरी, रवि शेंडे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.
तुमसरच्या निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी सिंदपुरी वासियांची घरकुल व तलाव दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. परंतु मुख्यमंत्र्यांची घोषणा ही फोल ठरली. मात्र लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने आश्वासने देवून दुर्लक्ष केले. आजही या बाधित कुटूंबियांना व शेतकर्यांना पुनर्वसनाची प्रतिक्षा आहे.
नुकतेच सिहोरा येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी व पुनर्वसनाच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी भव्य विराट आंदोलन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले, या प्रसंगी, शासनाच्या वतीने अधिकाऱ्यांनी संमंधीत सिंदपुरी व रेंगेपार या दोन्ही गावांचा गंभीर पुनर्वसनाचा मुद्दा शासनस्तरावर कार्यवाहिसाठी सादर करण्याचे कळविले, परंतु पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेले गावकरी अजुन कुठपर्यंत वाट पहतील, अशा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
भारतीय संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन व उत्थान कार्यशाळा
गोंदिया: स्थानिक भवभूति रंगमंदिर, रेलटोली येथे सास्कृंतीक मंत्रालय, भारत सरकार व विद्या भारती संस्कृती शिक्षण संस्थेच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत दिनेशभाई पटेल,सचिन जोशी व अनिल जोशी यांच्या व १० शाळेतील जवळपास ५०० विद्याथ्र्यांच्या उपस्थितीत ‘भारतीय संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन व उत्थान या विषयावरील कार्यशाळा पार पडली.आजच्या आधुनिक युगात आपल्या संस्कृतीला कायम ठेवून तीच संरक्षण व संवर्धन करून आपल्या देशाला प्रगत आणि संघटित राष्ट्र कसे करता येईल यावर ही कार्यशाळा पार पडली.अनिल जोशी यांनी सांस्कृतिक बाबींच आढावा देत भारतीय संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थांना पटवून दिले. डॉ विजय सूर्यवंशी यांनी विद्याथ्र्यांसी चर्चात्मक संवाद साधला.आपण मोठे होउन अधिकारी, राजनेता, शेतकरी, व्यापारी वगैरे बनत असतो पण आपण जर आपल्या संस्कृतीला जोपासून आपले कर्तव्य केले तर आपल्या देशाचा भविष्य उज्वल करता येवू शकतो. विविध शाळेंनी सांस्कृतिक झाँकी व समूहगान सादर केले. समारोप श्रीकांत देशपांडे,मनोज भुरे,सुरेश चन्ने व कार्यशाळा प्रांत प्रमुख सौ सुवर्णा पावडे यांच्या उपस्थितीत पार पडले.संचालन कार्यशाळा जिल्हा संयोजक वरुण खंगार व सौ चारुलता ढेकवार तर आभार अनिल बहेकार यांनी केले.
ब्रिटिशकालीन रेल्वे फाटक बंद करण्याच्या विरोधात सालेबर्डीवासियांचे आंदोलन
गोंदिया,दि.5- जिल्ह्यातून जाणार्या मुंबई हावडा रेल्वेमार्गावरील तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी येथील रेल्वेफाटक आजपासून बंद करण्याचा रेल्वेप्रशासनाच्या निर्णयाविरोधात माजी आमदार दिलीप बनसोड व जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात सालेबर्डीसह परिसरातील गावच्या नागरिकांनी आज सोमवारला रेल्वेचौकीसमोर आंदोलन केले. आंदोलनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद बघून दपूमरेल्वे नागपूर विभागाच्या अधिकार्यानी जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही,तोपर्यंत रेल्वेचौकी सुरु ठेवण्याचे आस्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.
सालेबर्डी गावाला लागून असलेल्या रेल्वेमार्गावर मागील शंभर वर्षापासून रेल्वे फाटक असून .याच रेल्वे फाटकातून पाच गावातील लोकांचे येणे जाणे आहे..मात्र चौकीवर काम करणाऱ्या लोकांनी गावकर्यांना हि रेल्वे फाटक ५ सप्टेंबर पासून बंद होणार असल्याची माहिती देताच .गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आणि ग्राम पंचायत,जिल्हा प्रशासनाला कुठलीही माहिती न देता. जिल्हा परिषदेच्या रस्त्यावरील रेल्वे फाटक बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतल्याने रेल रोको आंदोलन करण्याची भूमिका घेतली.त्यानुसार आज सकाळीच गावातील नागरिक रेल्वेचौकीजवळ एकत्र आले ते विदर्भ एक्सप्रेस या गाडीला थांबविण्याच्या मनस्थितीत असतानाच रेल्वेच्या अधिकायानी मध्यस्थीची भूमिका घेत मुबई हावडा रेल्वे लाईन हि हाय स्पीड रेल्वे लाईन असल्याने या ठिकाणची रेल्वे फाटक बंद करून रेल्वे अंडरग्राऊंड ब्रिज तयार करण्याची भूमिका घेतल्याचे माहिती तुमसर रेल्वेस्थानकावरील अभियंता बी.एम.पांडे यांनी आंदोलकांना माहिती दिली.त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दयाशंकर सिंहांचा पुन्हा तोल सुटला, मायावतींची तुलना कुत्र्याशी
नवीदिल्ली- उत्तर प्रदेश भाजपचे माजी उपाध्यक्ष दयाशंकर सिंह पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आले. दयाशंकर सिंह यांनी पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती टारगेट करत त्यांची कुत्र्याशी तुलना केली.
रविवारी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मायावती या अत्यंत धोकेबाज आणि डरपोक महिला आहेत. त्या एखाद्या कुत्र्याप्रमाणे आहेत. जेव्हा तुम्ही एका गल्लीतून दुचाकीवरून जात असता, तेव्हा अचानक एक कुत्रं तुमच्या मागे लागते. तुम्ही गाडी थांबवली तर ते कुत्रं मागे पळून जाते. तसं मायावतींचे असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी त्यांनी मायावती यांचे भाऊ बसपचे राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्र यांच्यावरही गंभीर आरोप केले. परंतु नंतर आपल्या वक्तव्यापासून फिरून उलट मायावती आणि त्यांचे सहकारीच मला कुत्रा म्हणतात, असे म्हटले.
यापूर्वीही त्यांनी मायावती यांना वेश्या म्हणून वाद ओढावून घेतला होता. मायावती यांनी राज्यसभेतही हा मुद्दा उठवला होता. या टीकेमुळे त्यांच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. यामुळे पक्षाने त्यांना निलंबित केले आहे. दयाशंकर सिंह यांना बिहारमधून अटक करण्यात आली होती. न्यायालयाने नंतर त्यांना जामीन दिला होता. तर दुसरीकडे बसपचे नेते आणि कार्यकर्ते आपल्या घरासमोर येऊन आंदोलन करून आपल्या मुलीविरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप दयाशंकर यांच्या पत्नीने केला होता. याप्रकरणी त्यांनी मायावती व इतर कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.