चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची निर्घृणपणे हत्या

0
12

पवनी- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत डोक्यात वरवंटा घालून पत्नीला ठार मारल्याची घटना पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे शुक्रवारी रात्री घडली. पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अर्चना अरविंद रामटेके (४0) असे मृत पत्नीचे नाव आहे. आरोपी पती अरविंद माधव रामटेके (४३) याला अड्याळ पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रानुसार, पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील अरविंद रामटेके याचे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील चांदोली येथील अर्चनासोबत विवाह झाला होता. अरविंद मागील २ वर्षापासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमीच वाद होत होता. शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी पती-पत्नीचे भांडण विकोपाला गेले.
रात्री ८ वाजताच्या सुमारास अरविंदने घराचा दरवाजा बंद करून पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातला. हा प्रकार माहित होताच गावकर्‍यांनी अर्चनाला उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी अर्चनाला तपासून मृत घोषित केले.
पती अरविंद रामटेके याला अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक हरिश्‍चंद्र इंगोले व हवालदार भुमेश्‍वर शिंगाडे करीत आहेत.