नववी-दहावीसाठी भाषांची तोंडी परीक्षा रद्द

0
9

मुंबई, दि. 14- नववी आणि दहावीच्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेच्या माध्यमातून शाळांकडून दिले जाणारे भरमसाठ मार्क आता बंद होणार आहे. भाषांची तोंडी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाषा विषयांसाठीची २० मार्कांची तोंडी आणि ८० मार्कांची लेखी परीक्षा हा नियम बंद करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी जाहीर केला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे यंदा नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांची १०० मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवावी लागणार आहे. दरम्यान, हे बदल यंदा फक्त नववीसाठी असून याची दक्षता शाळांनी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. राज्य शिक्षण मंडळाचा हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षांपासून दहावीसाठीही लागू होणार आहे.
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या भाषा, द्वितीय भाषांच्या तोंडी परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना गुण देण्याची मुभा ही शाळांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षकांकडून अनेक विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत पूर्ण मार्क दिले जात असल्याच्या तक्रारी होत्या. विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून नववी आणि दहावीच्या वार्षीक निकालही अपेक्षे पेक्षा जास्त लागलेला दिसून येतो आहे. यावरच बऱ्याच शिक्षणतज्ज्ञांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पुण्यात पार पडली होती. त्या बैठकीत परीक्षा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.