महाविद्यालयांना वीस टक्के वाढीव जागा-कुलगुरू डॉ. काणे

0
19

नागपूर,दि.31–राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बऱ्याच महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रथम वर्षाचे प्रवेश जवळपास “फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे यावर्षी राज्यातील सर्वच विद्यापीठातील महाविद्यालयांना वीस टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेमध्ये दिली.
बारावी परीक्षेच्या निकालात काही वर्षांपासून चांगलीच वाढ होत आहे. विद्यार्थ्यांचा विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे जाण्याचा कल वाढल्याचे दिसून येते. निकाल लागताच अनेक महाविद्यालयांचे प्रथम वर्षांचे प्रवेश “फुल्ल’ झाल्याचे चित्र दिसते. यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी किमान यावर्षी वीस टक्के जागा वाढ करण्याचे अधिकार द्यावे, यासाठी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी राज्यपालांना 24 जुलैला पत्र पाठविले होते. कुलगुरूंप्रमाणेच इतर विद्यापीठातील कुलगुरूंनी जागा वाढ करून देण्याची मागणी राज्यपालांना केली. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वीस टक्के जागा वाढवून देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. त्यानुसार दोन दिवसांत परिपत्रक काढण्यात येणार आहे.
गतवर्षीपर्यंत विद्यापीठ कायदा 1994 नुसार कुलगुरूंना थेट दहा ते वीस टक्के जागा वाढ करण्याचा अधिकार होता. यावर्षी नवीन विद्यापीठ कायदा 2016 नुसार कुलगुरूंचा हा अधिकार संपुष्टात आणण्यात आला. कायद्यामध्ये तशी स्पष्ट तरतूद आहे. नव्या नियमानुसार महाविद्यालयांना तुकडी देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जही मागविण्यात आले. मात्र, यासाठी फार जाचक अटी असल्यामुळे विद्यापीठातील साडेचारशेपैकी केवळ 19 महाविद्यालयांनी तुकड्या वाढीसाठी अर्ज केले. त्यापैकी 13 महाविद्यालयांचे प्रस्ताव मान्य केले. मात्र, या तुकड्यातून वंचित विद्यार्थ्यांना सामावून घेणे कठीण होणार आहे.