दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा-मुख्यमंत्री

0
9

मुंबई ,दि.07- बौद्धधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नागपूर येथील दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला त्यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असून या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्धधर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर गेली ६० वर्षे हे स्थळ केवळ देशातीलच नव्हे; तर जगभरातील बौद्धधर्मियांसाठी पवित्र मानले जाते. या ठिकाणी उभारण्यात आलेला भव्य स्तूप येथे येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरला आहे. देशातील बोधगया या शहराव्यतिरिक्त केवळ दीक्षाभूमीवरच बोधीवृक्ष आहे.

वर्षभरात जवळपास ११ लाख पर्यटक, भाविक आणि अभ्यासक येथे भेट देतात. त्यात सर्वसामान्य नागरिकांसोबतच विविध मान्यवरांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. याबाबत नागपूरचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी सरकारकडे दीक्षाभूमीच्या विकासासाठी प्रस्ताव पाठविले होते. यापूर्वी दीक्षाभूमीस ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून दर्जा देण्यात आला होता. मात्र गेल्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीच्या विकासाची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यानंतर याबाबतच्या कार्यवाहीला वेग देण्यात आला. त्यानुसार पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव सादर केला. त्यास मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याने बौद्धधर्मियांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. .