महाराष्ट्र दर्शनाने भारावले गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थी

0
13

 

नागपूर, ता. १६ ह्न आपला महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत फार पुढे गेला आहे, हे आम्हाला गडचिरोलीतील दुर्गम भागात राहून कधीच कळले नाही. शासनाच्या महाराष्ट्र दर्शन सहलीच्या माध्यमातून महाराष्ट्राची झालेली प्रगती प्रत्यक्ष पाहता आली. तसेच शिक्षणामुळे दुर्गम भागात राहूनही प्रगती साध्य करता येऊ शकते, असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे मनोगत महाराष्ट्र दर्शन सहल करून नागपूरात आलेल्या गडचिरोलीतील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
आमच्याकडे घनदाट जंगल आहेत. दूरवर शाळा आहेत. जंगलातून रोजची पायपीट होते. दळणवळणाची साधने म्हणून शासनाच्या एस.टी. बसेसवरच अवलंबून रहावे लागते. आश्रमशाळांच्या माध्यमातून शिक्षणाची सोय झाली आहे. मात्र गडचिरोलीच्या बाहेर निघून इतर शहरांनी कशी प्रगती केली, हे कधीच पहायला मिळाले नव्हते. शासनाने महाराष्ट्र दर्शन सहल आयोजित केल्यामुळे आमचे महाराष्ट्र दर्शनाचे स्वप्न पूर्ण झाले. या सहलीतून महाराष्ट्राची झालेली प्रगती जवळून बघता आली. त्यामुळे उच्च शिक्षण घेऊन आपली व गडचिरोली जिल्ह्याच्या प्रगतीसाठी हातभार लावण्याची प्रेरणा आम्हाला या सहलीच्या माध्यमातून मिळाली असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र पोलिसांतर्फे सुरू करण्यात आलेल्या सहलीच्या उपक्रमाचा हा बारावा टप्पा होता. या सहलीत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील ४२ मुले व ३७ मुली असे एकूण ७९ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात नक्षलपिडीत कुटुंबातील आणि नक्षल सदस्य असलेल्या कुटुंबातील ९ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी या विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर अशा विविध शहरांना भेटी देऊन त्या शहरांचा झालेला विकास बघितला. तसेच माहिती जाणून घेतली. आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती सहल योजनेच्या माध्यमातून गडचिरोली पोलिसांनी नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे दर्शन घडविले. सहलीच्या शेवटच्या टप्प्यात गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांनी नागपूर शहरातील विविध स्थळांना भेटी देऊन नागपूरसोबतच राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद या विविध शहरातील शैक्षणिक तसेच औद्योगिक प्रगती व विकासाची माहिती घेऊन महाराष्ट्र दर्शनाचा लाभ घेतला.

राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी शहरांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची ही सहल नागपूरात दाखल झाली. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी दोन दिवसांत शहरातील क्रेझी कॅसल वॉटर पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, दीक्षाभूमी, विधान भवनाजवळील वस्तु संग्रहालय, डॉ. रमन विज्ञान केंद्र या ठिकाणी भेटी देऊन विविध माहिती जाणून घेतली. या संपूर्ण सहलीत विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून विकासाचीसुध्दा माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र दर्शन सहलीचा बहुतांश प्रवास रेल्वेने करण्यात आला. यापूर्वी आम्ही कधी रेल्वेत बसलो नसल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले. शासन व पोलिसांनी ही संधी उपलब्ध करून दिल्याने सहलीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक असा झालेला विकास अनुभवता आला. याचा भविष्यात आम्हाला नक्कीच उपयोग होईल, असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
नागपूर येथील सहलीच्या यशासाठी नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शिवाजी बोडखे, अपारंपारिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य शमशेर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास सुपे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज बहुरे, पोलिस उपनिरीक्षक तथा प्रशासन अधिकारी दादा ईश्वरकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनकर चांभारे यांच्यासह इतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.