चंद्रपूर- जिल्ह्यातल्या मुल तालुक्यातील सोमनाथच्या जंगलात स्व. बाबा आमटे यांनी 1967 मध्ये मे महिन्यात युवाशक्तीत समाजासाठी श्रम करण्याची भावना तयार करण्यासाठी एक छावणी उभारली होती . त्या छावणीचे नाव होत श्रमसंस्कार छावणी. गेल्या 49 वर्षांपासून ही छावणी भरत असून यावर्षी तर राज्याच्या 33 जिल्ह्यातून आलेल्या 550 तरुण-तरुणीसह देशाच्या इतर भागातूनही अनेकांनी उपस्थिती लावली आहे.
रणरणत्या उन्हात हातात कुदळ, फावडं आणि घमेले घेऊन हे सर्व जण कामाला लागले. दगडी बंधारा बांधण्याचं काम सुरू आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरातले आणि देशाच्या इतर भागातले सुमारे साडेपाचशे तरुण-तरुणी सोमनाथच्या जंगलातल्या छावणीत दाखल झालेत.
पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत या छावणीतला उत्साह ओसंडून वाहत असतो. रोज पाच तास श्रमदान केलं जातं आणि त्यानंतर याठिकाणी होतं वेगवेगळ्या वक्त्यांकडून मार्गदर्शन…श्रमदानासोबतच या शिबिरात कला आणि संस्कृतीची देवाणघेवाणही होते. यातूनच पुढे भारत जोडो अभियान, राष्ट्रीय सेवा योजना अशा चळवळींची पायाभरणी झाली.