केंद्र शासन स्वच्छ शाळांसाठी पुरस्कार देणार

0
18

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.04: केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून आता देशातील सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य संपन्न जीवनाचा लाभ मिळावा, तसेच सर्व रोगांपासून मुक्त अशा निरामय व आनंदी जीवनाचा लाभ व्हावा, यासाठी दिनांक 1 ते 31 ऑक्टोबर 2015 या कालावधीत ‘स्वच्छ-विद्यालय- स्वच्छ- महाराष्ट्र’ मोहिम कार्यान्वित करण्यात आली होती. याअंतर्गतच सर्व शाळांसाठी स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराबाबतच्या मार्गदर्शन सूचना, शाळांसाठी नामनिर्देशन करताना आवश्यक असलेली प्रश्नावली केंद्र शासनाकडून मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर तसेच ‘स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे. त्या अभियानाचा भाग म्हणूनच हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत.

या पुरस्कारासाठी शासकीय व अनुदानित शाळा पात्र असून त्यांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर 100 शाळा, राज्य पातळीवर 40 शाळा आणि जिल्हा पातळीवर 48 शाळा यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या शाळांनी अपलोड केलेल्या प्रस्तावातील माहितीची प्रत्यक्ष पडताळणी जिल्हा आणि तालुका स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून करण्यात येईल. पुरस्कारासाठी शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयाची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था, देखभाल व्यवस्था, वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा 5 क्षेत्रांमध्ये एकूण 39 घटक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून त्यांना श्रेणी देण्यात येणार आहे.

या निकषामध्ये 90 ते 100 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना हिरवा रंग, पाच श्रेणी आणि अत्युत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. 75 ते 89 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना निळा रंग, चार श्रेणी आणि उत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. 51 ते 74 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना पिवळा रंग, तीन श्रेणी आणि उत्तम परंतू सुधारणेस वाव असा शेरा दिला जाणार आहे. 35 ते 50 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना नारंगी रंग, दोन श्रेणी आणि ठीक – सुधारणेची गरज असा शेरा दिला जाणार आहे. तर 35 टक्के पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या शाळांना लाल रंग, एक श्रेणी आणि सुधारणेची आत्यंतिक गरज असा शेरा दिला जाणार आहे.

या पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी दिनांक 1 जुलै ते 31 जुलै, 2016 ही कालमर्यादा देण्यात आली आहे. 31 जुलै 2016 पूर्वी पुरस्कारासाठी अर्ज करायचा आहे. या पुरस्कारासाठी शाळांना अर्ज करताना शाळेचा असलेला युडायस क्रमांक नोंदवून लॉगीन करता येते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.

स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर तसेच स्वच्छ विद्यालय पुरस्कार मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध प्रश्नावलीनुसार सर्व शाळांना याकरिता अर्ज करता येईल. हे मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर मधून किंवा 07097298400 या क्रमांकावर मिस्ड कॉल देवून डाऊनलोड करता येईल.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक 201607021506029621 असा आहे.