ग्राम समृध्दी व स्वच्छता पंधरवाडा कौशल्य रथातून जनजागृती

0
15

गोंदिया,दि.४ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मिशन अंत्योदय १ ते १५ ऑक्टोबर दरम्यान कौशल्य रथाच्या माध्यमातून ग्रामविकासासाठी लोकांचा सहभाग व भागीदारी वाढविण्याकरीता ‘ग्राम समृध्दी व स्वच्छता पंधरवाडाङ्क साजरा केला जात आहे. याकरीता कौशल्य रथ व कलापथकाद्वारे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात योजनांची प्रचार प्रसिध्दी करणे सुरु आहे.
कौशल्य रथाचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यातून १ ऑक्टोबरला झाला असून हा रथ चंद्रपूर नंतर गडचिरोली जिल्ह्यात व त्यानंतर ३ ऑक्टोबरला गोंदिया जिल्ह्यात आला होता. या रथाचे जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांच्याद्वारे उपमुख्य कार्यकारी अ‍धिकारी (सामान्य प्रशासन), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापक, अभियानातील अधिकारी/कर्मचारी, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जि.प.गोंदिया अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले.
कौशल्य रथामार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, माझे कौशल्य माझी ओळख, सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेची प्रचार प्रसिध्दी करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांनी ‘ग्राम समृध्दी व स्वच्छता पंधरवाडाङ्क या कार्यक्रमामध्ये विभाग प्रमुख व ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आपल्या स्तरावर पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कौशल्य रथाला पुढील कार्यक्रमाकरीता भंडारा जिल्ह्याला जाण्याकरीता हिरवी झेंडी दाखविण्यात आली.