साहित्य संमेलनाने अबोल समाज बोलका झाला-संमेलनाध्यक्ष बोढेकर

0
28

जवाहरनगर ,दि.२४ः:बोलीशिवाय भाषा म्हणजे चैतन्य हरपलेल्या शब्दांचे पार्थिव. या झाडीबोली साहित्य संमेलनांनी अल्पशिक्षित असणारा आपला मुका समाज बोलायला, लिहायला लागला. आपले विचार, वेदना, आनंद, समस्या, साहित्यातून मांडण्याची हिंमत त्याला आली. समस्या सोडविण्याचा मार्ग त्यातून गवसला. अनेक प्रसंगांना, विचारांना, चालीरितींना, आधुनिकेतची वाट मिळाली. अबोल समाज बोलका झाला, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी केले.

तुलसी बहुउद्देशिय शिक्षण संस्था, महात्मा गांधी अभ्यास केंद्र व झाडीबोली साहित्य मंडळ साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. घनश्याम डोंगरे, साहित्य नगरी पेट्रोलपंप जवाहरनगर येथील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्षपदी बंडोपंत बोढेकर हे होते. यावेळी डॉ. हरिश्चंद्र बोरकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेश टेंभरे, राम महाजन, हिरामन लांजे, डॉ. तिर्थराज कापगते, डॉ. अनिल नितनवरे, उदय किरोला, मोतीभाई नायक, शिवशंकर बावनकुळे, डॉ. राजन जयस्वाल, डॉ. गुरूप्रसाद पाखमोडे, शिवशंकर घुगूल, मिलिंद रंगारी, प्राचार्य अजयकुमार मोहबंशी सर्व माजी समेलनाध्यक्ष उपस्थित होते.बोढेकर म्हणाले, लोककला, लोकवाड:मय, त्यातील कलावंतांना या चळवळीमुळे प्रसिद्धी, सन्मान मिळाला. मुकुंदराज स्वामींचा गौरव सोहळा, कवी भवभुतींच्या स्मृतींना उजाळा मिळाला. अशा विस्मृतीत गेलेल्या महान लेखकांच्या जीवन व साहित्याला नवसंजीवनी देण्याचे काम या चळवळीने केले आहे. आपल्या झाडीप्रदेशाची वृत्तपत्रे, दुरदर्शन, आकाशवाणी तसेच शासकीय विद्याशाखा व संस्थांनाही या चळवळीची, साहित्य संमेलनाची दखल घ्यावी लागली. बोलीभाषेत बोलणारा मराठी समाजच तिला उर्जीतावस्था प्राप्त करून देणार आहे, याची ग्वाहीच या झाडीबोली साहित्याने, साहित्य संमेलनाने दिली आहे.

भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते तर तिला भाषाशास्त्राचे नियम लावून आपण तिला अधिक क्लिष्ट करीत असतो. झाडीबोली ही परिवर्तनवादी चळवळ आहे. बोली ही मुळात पवित्र असून तिची सेवा करणाऱ्या झाडीबोली चळवळीने एक दबावगट निर्माण केला आहे, असे प्रतिपादन अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी उद्घाटनपर भाषणात केले.यावेळी श्रीपाद जोशी यांनी, भाषेच्या बाबतीत विदर्भातील माणसं लहान वाटतात आणि पलिकडील माणसं मोठी वाटतात हे आपलं सत्व झुगारून दिल पाहिजे. जे भाषेच्या संबंधात अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे पहिले अध्यक्ष अनिल यांनी झुगारले आणि अनुस्वार तिकडेच फेकले. ११ व्या शतकापासून १७ व्या शतकापर्यंत विदर्भ हा भाषा कला सांस्कृत नाटक, आश्वाद, खगोल ज्योतीशास्त्र, गणित, कृषीमध्ये नायक होता, हे विषरता कामा नये. वेदकाळापासून या महाराष्ट्राच्या कुठल्या भूमिचा जर विचार केला असेल तर तो विदर्भभूमीचा उल्लेख होते आणि ते अत्यंत बहुधार्मिक, बहुसांस्कृतीक, बहुभाषीक अशा संस्कृतीचा होतो.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा भाग व्याप यात तीन संस्था सम्मेलीत होत काळाची गरज आहे. यात कोकण महाराष्ट्र साहित्य परिषद दुसरे म्हणजे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा व आपले झाडीबोली साहित्य मंडळ यामुळे साहित्याला नव उजाळा मिळेल नवचैतन्य लाभेल, असे प्रतिपादन केले. तत्पुर्वी सकाळी पुस्तक दिंडी काढण्यात आली. ताळमृदुंगाच्या गजरात दिंडीला सुरूवात करण्यात आली. दंडार, खडी गंमत, भारूळ सादर करण्यात आले. तदनंतर पाहुण्याचे मार्गदर्शन झाले.

डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांनी या चळवळीचे वेगळेपण उदाहरणासह स्पष्ट केले. पूर्व स्वागताध्यक्ष मधुसुदन दोनोडे यांनी अनुभव कथन केल्यानंतर विद्यमान स्वागताध्यक्ष डॉ.मनिष टेंभरे स्वागतपर भाषण केले.याप्रसंगी उत्तराखंडचे उदय किरोला आणि गुजरातचे मोतीभाई नायक यांनी स्वप्रांतातील आठवणी सांगून झाडीबोली चळवळीची प्रशंसा केली. डॉ.अनिल नितनवरे, डॉ. तीर्थराज कापगते यांनी मार्गदर्शन केले. लोकराम शेंडे यांनी ‘झाडीगौरव’ गीतांचे गायन केले.साहित्य संमेलनाचे प्रस्तावना डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी, संचालन प्रा.नरेश आंबिलकर यांनी तर आभारप्रदर्शन प्राचार्य अजय मोहबंसी यांनी केले.रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने २५ ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.