लग्नात पाहुण्यांनी दिला ५० हजारांच्या पुस्तकांचा आहेर

0
28

गोंदिया,दि.4 आतापर्यंत अनेक विवाह सोहळे शाही पद्धतीने पार पडलीत. मोठा थाटमाट करताना पैसाही बक्कळ खर्ची घातला जातो. एखादा लग्न सोहळा इतरांनाही मदतगार ठरू शकेल याचा विचार करणारे कमीच. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील भजेपार गावच्या चंद्रकुमार बहेकार या युवकाने स्वत:च्या लग्नात सामाजिक ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. पुष्पगुच्छ, कपडे आणि पैशांचा आहेर न आणता स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणण्याचे आवाहन त्याने केले. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यामंडळींनी प्रतिसाद देत तब्बल ५० हजारांच्या पुस्तकांचा आहेर नवरदेव-नवरीकडे भेट दिला. साध्या पद्धतीने हा विवाह लावून नवरदेवाने गोरगरिब आणि मनोरुग्णांकरिता झटणाऱ्या दिव्या फाऊंडेशनला २५ हजारांचे अर्थसाह्य केले.

या लग्नसोहळ्यातून सामाजिक जागृतीचा मोठा संदेश पेरण्यात आला. चंद्रकुमार काशीराम बहेकार हा दिव्या फाऊंडेशनचा समन्वयक आहे. गोंदिया जिल्ह्यातील भजेपार येथील चंद्रकुमार काशीराम बहेकार आणि निंबा येथील प्रेरणा यशवंत शिवणकर यांचा अनोखा विवाह २९ एप्रिल रोजी आमगावात पार पडला. या अभिनव लग्न सोहळ्याला उपस्थित वऱ्हाड्यांचे वृक्षांची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.लग्नपत्रिका आकर्षक आणि इतरांपेक्षा हटके असावी, त्यामध्ये वेगळं काहीतरी चर्चेचं असावं असा प्रयत्न वधू-वराकडील मंडळींचा असतो. चंद्रकुमार बहेकार आणि प्रेरणा शिवणकर या नवदाम्पत्यानेसुद्धा स्मरणात राहील असे कार्य लग्नपत्रिका आणि लग्नातून केले आहे. लग्नपत्रिका छापताना त्यामध्ये ‘वृक्षारोपण, स्वच्छता, बेटी बचाव, बेटी पढाव’चा संदेश दिला. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे सांगतानाच मतदान माझा हक्क आणि कर्तव्य असल्याचे प्रकर्षाने नमूद केले. वटवृक्षाचे फायदेसुद्धा सांगितले. गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणण्याचे आवाहन करण्यात आल्याने तब्बल ५० हजारांची पुस्तके आहेर म्हणून देण्यात आली. भारतीय संविधान, एमपीएससी, यूपीएससीसाठीची पुस्तके वधू-वरांनी भजेपार गावात तरुणांनी उभारलेल्या स्वामी विवेकानंद वाचनालयास दिली.

युवावर्गाने आपल्या लग्नात असे सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दिव्या फाऊंडेशनचे बुलडाणा येथील संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे, सदस्य संध्या फुंडे, गजानन अवसमोल, विजय बहेकर, सचिन फुंडे, मंगेश ठाकरे, अमर काळे यांनी या अभिनव लग्नसोहळ्याची जबाबदारी पार पाडली.

लग्नात उच्चारली महात्मा फुलेंनी दिलेली मंगलाष्टके

विवाहसमयी राजमाता जिजाऊ, जगद्गुरु तुकोबाराय, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. रीतीरिवाजाला फाटा देत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्ममध्ये लिहिलेल्या मंगलाष्टकांनुसार हा लग्नविधी पार पडला.