स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सप्ताहास प्रारंभ : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण

0
17

मुंबई दि.३-: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील गायवळ (ता. कारंजा) आणि माेहरी (ता. मंगरुळपीर) येथे वृक्षारोपण करुन पर्यावरण सप्ताहाचा प्रारंभ केला.
मुख्यमंत्री बुधवारी अकोला आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. ग्रामविकासाच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या आणि राज्याला दुष्काळमुक्तीकडे नेणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. लोकसहभागाच्या माध्यमातून समृद्धीकडे नेणारी जलयुक्त शिवार योजना सुरू केल्याबद्दल गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
वाशिम जिल्ह्यातील गायवळ येथे पाझर तलाव दुरूस्ती आणि सिमेंट बांधाच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मंगरूळपीर तालुक्याच्या शिवनी रोड येथील मदन कालू गारवे आणि संजय टाले या आत्महत्या केलेल्या दोघा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
मोहरी या गावात ‘आपलं गाव-आपलं पाणी’ या योजनेंतर्गत भूजल पुनर्भरण कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेला राज्यभर मिळत असलेला प्रतिसाद आणि लोकसहभाग पाहून आपण भारावलो आहोत. यावेळी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
वाशिमचा दौरा आटोपून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज गौतमी नदी येथील पुनरुज्जीवन कामांची पाहणी केली. त्यानंतर माळेगाव बाजार येथे नाला रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामांना भेटी दिल्या.
माळेगाव बाजार येथील विनोद खरोडे या शेतकऱ्याने वीज जोडणी न मिळाल्याच्या कारणावरून आत्महत्या केली असल्याची माहिती गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. तेव्हा नियोजित कार्यक्रमात नसतानाही श्री. खरोडे यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मुख्यमंत्री त्यांच्या घरी गेले. जोडणी देण्यासाठी विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
घुसर येथील शेततळ्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. या शेततळ्यातून 1130 हेक्टर इतकी जमीन सिंचनाखाली येणार आहे. या गावातील संजय कुणेकर आणि गोपनारायण या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन दिलासा दिला. यावेळी गोपनारायण यांच्या कुटुंबियांना शासनातर्फे 1 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. या दोन्ही दौऱ्यानंतर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी अकोला आणि वाशिम जिल्ह्यांचा प्रशासकीय आढावा घेतला.