कर्जबाजारी तरुण शेतक-याची आत्‍महत्‍या

0
8
यवतमाळ – सततची नापिकी आणि वाढलेले कर्ज यामुळे त्रस्त झालेल्या, एका तरुण शेतकऱ्याने पालकमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून जीवनयात्रा संपवली. नेर तालुक्यातील मारवाडी या गावात ही घटना घडली आहे. येथील विशाल नामदेव पवार या 32 वर्षीय शेतक-याने पालकमंत्री संजय राठोड यांच्या नावाने चिठ्ठी लिहीली नंतर शेतातील विहिरीत उडी घेऊन त्‍यांनी आत्‍महत्‍या केली.
विशाल यांनी गुरुवारी रात्री शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी एका वहीत काही चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. गुरुवारी सकाळी ती वही आणि विशालचे कपडे विहिरीच्या काठावर आढळून आले. त्या वहीत पालकमंत्री संजय राठोड यांच्या नावाने लिहून ठेवलेली चिठ्ठीही आढळून आली.
विशालने वडील, आई, पत्नी आणि मुलगी यांच्या नावानेही चिठ्ठी लिहिलेली आहे. त्यात सततच्या नापिकीमुळे आणि शेतीवर वाढलेल्या कर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच घरची जबाबदारी पार पाडणे असमर्थ होत असल्याने निरोप घेत असल्याचे त्याने चिठ्ठीत म्हटले आहे.