स्वच्छ भारत मिशनमध्ये कोल्हापूरचा देशात पहिला नंबर

0
15

कोल्हापूर ,दि.२६ :-  स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हयाचे उल्लेखणीय काम झाले असून स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे. येत्या 2 ऑक्‍टोबर रोजी राष्ट्रीय स्तरावर होणा-या कार्यक्रमात स्वच्छता दर्पण पुरस्काराने कोल्हापूर जिल्हयास गौरविले जाणार आहे. पुणे विभागात कोल्हापूरसह सांगली व सातारा हे जिल्हेही प्रथम क्रमांकावर आहेत.

सोमवारी (ता. 2 ऑक्‍टोबर) महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयामार्फत स्वच्छता दर्पण पुरस्काराचे आयोजन केले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत होणाऱ्या कामांवर आधारित याचे गुणांकन केले गेले असून यामध्ये कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आहे.

स्वच्छतेवर आधारित देलेल्या गुणांकनानुसार जिल्हयाला 90 % इतके गुण मिळाले आहेत. सोमवार (ता. 25)  पर्यंत झालेल्या कामगिरीवर हे गुणांकन ठरले आहे. केंद्र शासनाकडून या स्पर्धेसाठी कामगिरी, शाश्वत्ता आणि पारदर्शकता या तीन घटकांवर आधारित जिल्हयांचे गुणांकन केले आहे. कोल्हापूर जिल्हयाला कामगिरीमध्ये 50 पैकी 50 गुण मिळाले आहेत तसेच शाश्वत्ता या घटकासाठी 25 पैकी 15 गुण मिळाले आहेत तसेच पारदर्शकतेसाठी 25 पैकी 25 गुण मिळाले आहेत.

कोल्हापूर जिल्हा प्रथम स्थानावर येण्यासाठी जिल्हास्तरावर पाणी व स्वच्छता विभाग, तालुकास्तर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा. पं),गटसंसाधन केंद्रातील कर्मचारी, आणि ग्राम पंचायत स्तरावर ग्रामसेवक आणि ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कामगिरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल
खेमनार यांचे मार्गदर्शन लाभले. तर काम वेळेत पुर्ण करून घेण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई या विभागातील तज्ञ व सल्लागार यांनी विशेष परिश्रम घेतले.