मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अंदाज

0
4

मुंबई,दि.03 : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याकाळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे.अतिवृष्टीमुळे खरीपाचे उत्पादनास नुकसान होऊ शकते. सध्या कापणीयोग्य असलेल्या शेतमालास त्यामुळे फटका बसू शकतो. शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे नुकसान टाळावे, यासाठी त्यांनी हा शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. जेथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा तसे नियोजन केले असेल तर तो माल व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. अतिवृष्टीमुळे शेती मालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी नियोजन करावे, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले आहे.

याकाळात विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळण्याच्या दुर्घटना देखील घडू शकतात, अशावेळी ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी बांधवांनी स्वताःचा आणि जनावरांचा विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, पत्र्याच्या शेडमध्ये, विजवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मर जवळ थांबू नये. 5 ते 14 ऑक्टोबर याकाळात मुंबई आणि कोकण पट्ट्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.