नवी दिल्ली,दि,8-“बिहारची जनता विचाराने श्रीमंत आहे. देशाला नवी दिशा दाखवली त्याबद्दल बिहारच्या जनतेचे मन:पूर्वक आभार आणि नितिश कुमार, लालु प्रसाद यादव, शरद यादव आणि महाआघाडीच्या सर्व नेत्यांचे हार्दिक अभिनंदन !” अशा शब्दांत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बिहारमधील निवडणुकीच्या निकालांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘दिल्ली पाठोपाठ आता बिहारमध्येही भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये होणार्या निवडणुकीतही अशाच प्रकारचे निकाल अपेक्षित राहतील. देशात पसरलेली असहिष्णुता, धर्मावर आधारीत राजकारण व खोटी आश्वासने यामुळे देशातील जनतेने भाजपला नाकारायला सुरुवात केली आहे. देशाच्या राजकारणात बिहारच्या निवडणुकीनंतर भाजपविरोधी वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे’, असे पवार यावेळी म्हणाले.
बिहारच्या जनतेचे अभिनंदन करताना पवार म्हणाले की, बिहारनेच वेळोवेळी देशात सत्तापरिवर्तनाची दिशा दाखवली. चंपारण्य आणि महात्मा गांधीचे आंदोलन असो किंवा जेपींचे आंदोलन असो, सुरुवात बिहारनेच केली. आताही देशात तेच पुन्हा एकदा होताना दिसत आहे. प्रत्येक राज्यातील समविचारी पक्ष एकत्र आले तर भाजपला रोखता येऊ शकते, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.