राजकारणाची दिशा समजून घ्यायची असेल तर पवारांसोबत काही वेळ घालवा -मोदी

0
10

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. १० – निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी NCP चं वर्णन नॅचरली करप्ट पार्टी असं करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात मात्र, पवारांवर स्तुतीसुमनांची उधळण केली. पवारांच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, सोनिया गांधी, राहूल गांधी, प्रतिभा पवार, मनमोहन सिंग, देवेंद्र फडणवीस ,बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार, लालू प्रसाद यादव उद्योगपती गौतम अदानी, अनिल अंबानी, राहुल बजाज, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार प्रामुख्याने उपस्थित होते. 

शरद पवार यांनी राजकीय क्षेत्रात काम करीत असतानाही सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्याच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणले. कोणत्याही गोष्टीच्या रचनात्मक उभारणीवर त्यांचा विशेष भर आहे. शेतकऱ्याला जसा हवामानाचा अंदाज असतो तसा शरद पवारांना राजकारणाचा अंदाज येतो. भारताचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर त्यांच्यासोबत काही वेळ घालवावा लागेल, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना शरद पवार म्हणाले, की आज माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे. सर्वांनी मला भरभरुन प्रेम दिले. देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. संसदेच्या मर्यादा सांभाळून मी आजपर्यंत काम केले. कामकाज सुरु असताना कधी गोंधळ घातला नाही. वेलमध्ये जाऊन काम विस्कळित केले नाही. कृषी खात्याचे काम करताना विकासाचा आलेख नेहमी चढता ठेवला.

शरद पवार म्हणाले, की भारत हा कृषीप्रधान देश आहे. तांदूळ उत्पादनात देशाचा पहिला तर गव्हाच्या उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. माझे वडील शेतकरी होते. त्यामुळे शेतीचा वारसा लाभला आहे. देशात महिला शिक्षण आणि महिला सबलीकरणावर जोर देण्याची गरज आहे.

यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, की स्वच्छ प्रतिमेचा नेता अशी शरद पवार यांची जनमानसात ओळख आहे. भारतीय क्रिकेटचे व्यवस्थापनदेखील त्यांनी समर्थपणे केले. पवारांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यादेखील वडिलांप्रमाणेच हुशार राजकारणी आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग
म्हणाले की, शरद पवार यांचा भारताच्या विकास मोठा वाटा आहे.UPA सरकारच्या काळात आम्ही शरद पवार यांच्याबरोबर काम केले. त्यांनी अत्यंत प्रभावीपणे कृषीखाते सांभाळले. शरद पवार हे आधुनिक विचारसरणीचे नेते आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवारांनी देशाच्या विकासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. सामाजकारणातही शरद पवारांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे.