शेतकर्‍यांना पेन्शन दिल्यास आत्महत्या थांबणार-अॅड.माने

0
22

पत्रकार परिषदेत माहिती

२७ जुलैला मंत्रालयावर मोर्चा : बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्षाची मागणी

गोंदिया,दि.16 : केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकार्‍यांना सेवानवृत्तीनंतर नवृत्ती वेतन (पेंशन) दिले जाते. शासकीय अधिकारी-कर्मचार्‍यांप्रमाणे शेतकर्‍यांनाही वयाच्या ६0 व्या वर्षी शेती कामातून नवृत्ती देऊन त्यांना मासिक पाच हजार रुपयांची पेंशन योजना लागू करावी. त्यातून शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखता येतील, असा आशावाद बहुजन रिपब्लिकन समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश माने यांनी गुरुवारी व्यक्त केला.
स्थानिक केमिस्ट भवन सभागृहात बीआरएसपीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. माने पत्रकार परिषदेत बोलत होते.बीआरएसपीने २७ जुलै रोजी मुंबई विधानसभेवर शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकरिता मोर्चाचे आयोजन केले आहे. त्याच्या पूर्वतयारी मेळाव्यात डॉ. माने म्हणाले की, शेतकर्‍यांना स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारसी लागू कराच. त्यासोबत शेतकर्‍यांना पेंशन लागू केली तरच शेतकरी आत्महत्या थांबू शकतात. चौधरी देवीलाल यांनी हरियाणामध्ये शेतकर्‍यांसाठी पेंशन योजना लागू केली होती. देवीलाल पेंशन देऊ शकतात, तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांना पेंशन देणे कठीण नाही. सध्या महाराष्ट्र कर्जबाजारी आहे. प्रत्येक नागरिकांवर २७ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे, हेदेखील खरे आहे. सरकारने १ एप्रिल २0१५ ते ३१ मार्च २0१६ रोजीपर्यंत पेट्रोल, डिझेलवर दोन टक्के दराने कृषी कर वसूल केला आहे. त्यातून सरकारला ३ हजार ३३६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या पैशातून पेंशन देणे कठीण नाही. तशी हमी दिली तर आजच आत्महत्या थांबतील.
निवडणूक तंत्राला चुकीच्या पद्धतीने राबवून काँग्रेस, भाजपसारखे मोठे पक्ष सत्तेवर येत आहेत. ही पद्धत बंद केल्याशिवाय आंबेडकरी चळवळ यशस्वी होणार नाही. निवडणुकीत काळा पैशाच वापर मुक्त हस्ते सुरू आहे. काळ्या पैशामुळे महागाई, जमिनीचे भाव आदी वाढतात. मोदींनी विदेशी बँकांमधून काळा पैसा परत आणण्याचे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्ष तसे काहीही घडलेले नाही. निवडणुकीत व्यापारी मोठय़ा पक्षांना पैसे देतात, असा आरोप करून डॉ. माने म्हणाले की, राजकीय पक्षांमध्ये समांतर पातळीवर स्पर्धा झाली पाहिजे. तेव्हाच खरी लोकशाही निर्माण होईल. काळा पैसा थोपविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने १000 व ५00 रुपयांच्या नोटा बंद केल्या पाहिजे. २७ जुलैच्या मोर्चानंतर रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरची भेट घेऊन बीआरएसपीकडून या नोटा बंद करण्याचे निवेदन सादर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.यावेळी रमेश जनबंधु, छैलबिहारी अग्रवाल,प्यारेलाल जांभुळकर,सुधाकर शिवणकर,अतुल सतदेवे,प्रा.डी.एस.मेश्राम उपस्थित होते.