अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
18

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग कृषी प्रक्रिया उद्योगासाठी वरदान ठरणार

नवी दिल्ली येथे 3 ते 5 नोव्हेंबर 2017 दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2017चे आयोजन

शाश्वत शेतीसाठी अन्न प्रक्रिया उद्योग महत्वाचा घटक

· ‘किसान संपदा योजने’तून राज्याला तीन मेगा फूड पार्क, 50शीतसाखळी प्रकल्प तसेच 17 अन्न चाचणी प्रयोगशाळांचे प्रकल्प मंजूर

· महाराष्ट्र हे देशाचे ‘फ्रूट बास्केट’

· मसाला पिकाच्या निर्यातीत महाराष्ट्र अग्रेसर

मुंबई, दि. 21 : महाराष्ट्रात फळ आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहे. मध्य आशियातील देशांकडून महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी विचारणा होत आहे. जागतिक बाजारपेठेला राज्यामध्ये मोठी संधी असून,अन्न
प्रक्रिया उद्योगामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील,अशी ग्वाही देत मुंबई –नागपूर समृध्दी महामार्ग कृषी प्रक्रिया उद्योगासाठी वरदान ठरणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागामार्फत नवी दिल्ली येथे 3 ते 5 नोव्हेंबर 2017 दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया 2017चे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिकस्तरावरील प्रदर्शनामध्ये राज्यांनी सहभागी व्हावे यासाठी या क्षेत्रातील गुंतवणूकदारांना माहिती देण्याकरिता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याची सुरवात महाराष्ट्रापासून करत येथील हॉटेल ताज
विवांतमध्ये या उपक्रमासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसीमरत कौर बादल, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, केंद्रीय अन्न प्रक्रिया विभागाचे सचिव जगदिशप्रसाद मिना, राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, सीआयआयच्या अध्यक्ष शोभना कामियनी आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, शाश्वत शेतीसाठी अन्न प्रक्रिया उद्योग महत्वाचा घटक ठरत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अन्य उपाययोजनांसोबतच मुल्य साखळी (व्हॅल्यू चेन्स) आवश्यक असून ही साखळी अधिक वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगाने सुरु केलेल्या अनेक योजना राज्यात यशस्वीरित्या राबविल्या जात आहे.उद्योजकांशी सातत्याने संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडविले जात आहे.केंद्र शासनाच्या योजना राज्यात यशस्वी करण्यासाठी टीम म्हणून काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. अन्न प्रक्रिया उद्योग विकासात भर घालत असून या क्षेत्रात अमाप संधी आहे.राज्यात जेएनपीटी सारखे बंदर असल्याने उद्योग विस्ताराला मोठ्या प्रमाणावर यश मिळत आहे.
समृध्दी महामार्गाने मुंबई नागपूर ही दोन्ही महानगरे जोडण्यात येणार आहे.या महामार्गामुळे 24 जिल्हे एकमेकांशी जोडली जाणार असून कृषी प्रक्रिया उद्योगांची साखळीच या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्याबरोबरच प्रक्रिया उद्योगाचा हातभार लागणार आहे. केंद्र शासनाने नुकतेच सुरु केलेल्या ‘किसान संपदा योजने’च्या माध्यमातून राज्याला मेगा फुड पार्क, शीतगृहे तसेच अन्न चाचणी प्रयोगशाळांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहे. त्यामाध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र हे देशाचे ‘फ्रूट बास्केट’ म्हणून ओळखले जाते. फलोत्पादनात राज्य अग्रेसर असून कोका कोला, पेप्सी यासारख्या कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक केली आहे. कोका कोलाच्या सहाय्याने मोसंबी पल्प बनविण्याचा प्रकल्प तर मोर्शी येथे बारा प्रकारच्या फळांवर प्रक्रिया करणार उद्योग सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्र फळ प्रक्रिया आणि अन्न प्रक्रिया उद्योगात अग्रेसर आहे. कृषीतील विविध प्रयोगशीलता, पायाभूत सुविधा यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राज्यात पोषक वातावरण आहे. जागतिक स्तरावरील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी.उद्योग उभारणी करताना अडचणी आल्यास त्या सोडविण्यासाठी मदत करु.अन्न प्रक्रिया उद्योगामुळे वाया जाणाऱ्या अन्नाचे प्रमाण देखील कमी होणारआहे. ही भविष्याची गरज असल्याने गुंतवणुकीसाठी संधी म्हणून त्याकडे पहावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
नवी दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक स्तरावरील अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानतो. या प्रदर्शनात महाराष्ट्र शासन तसेच राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगातील उद्योजक मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.