अवघा महाराष्ट्र धुमसत असताना भाजपाचा सांस्कृतिक महोत्सव

0
11

नागपूर,दि.06- सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने अनेक आश्वासने दिली. मात्र, आता दिलेल्या आश्वासनांचा भाजपाचा विसर पडला आहे. शहर बकाल झाले आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी भाजपा सांस्कृतिक कार्यक्रम करीत आहे. भीमा कोरेगाव येथे नुकत्याच घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यात असंतोष पसरला आहे. त्यामुळे नागपुरात होणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.निवडणुकीपूर्वी भाजपाने अनेक आश्वासने दिली. भाजपा नेते त्याबद्दल काहीच बोलत नाही. आता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना आमचा आक्षेप नाही. मात्र, भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर समाजमन क्षुब्ध झाले आहे. त्यामुळे हा महोत्सव निदान पुढे ढकलण्याचे सौजन्य सत्ताधाऱ्यांनी दाखवायला हवे होते. असे कार्यक्रम करून मूळ आश्वासनापासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा भाजपाचा डाव आहे. नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावरही विकास ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले. पत्रपरिषदेला विशाल मुत्तेमवार उपस्थित होते.