गडचिरोली,दि.02 : संपूर्ण राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असताना केवळ गडचिरोली जिल्ह्याला त्यातून वगळण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ केला असून भाजपाच्या लोकप्रतिनिधींना जनतेने रस्त्यावर फिरू देऊ नये, असे आवाहन कांॅग्रेसचे विधीमंडळ उपनेते तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केले. आमदार वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेला जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम, डॉ. नितीन कोडवते, महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, कुणाल पेंदोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. .
बाजुच्या चंद्रपूर जिल्ह्यात गोसेखुर्द सारखे मोठे धरण असून सुद्धा त्याठिकाणी दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात कुठलेही मोठे धरण अथवा सिंचनसाठा नाही. त्याचबरोबर मागील वर्षीच्या तुलनेत ३३ टक्के कमी पर्जन्यमान झाले आहे. शासनाकडून दरवर्षी तीन वेळा सर्व्हेक्षण करण्यात येते. यात पऱ्हे टाकल्यावर, रोवणी झाल्यानंतर व कापणी होऊन पीक हाती आल्यावर आता, यातील दोन सर्व्हे पूूर्ण झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेमुळे अधिकाऱ्यांनी सरासरीपेक्षा जास्त आणेवारी दाखविली आहे. परिणामी, तिसऱ्या सर्व्हेनंतरही या जिल्ह्यात दुष्काळ घोषित होणे कदापि शक्य नाही. जिल्ह्यातील अनेक भागात पोळ्यानंतर पावसाने डोळे वटारले. त्यामुळे अनेक तालुक्यातील भात करपला तरीही स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प असून शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करीत आहेत. अशा लोकप्रतिनिधींना जनतेनी रस्त्यावर फिरू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.