भिमाबाईच्या जीवनात उगवली विकासाची पहाट

0
8

यशकथा

स्त्री आणि पुरुष ही जीवनाच्या रथाची चाके आहे. ही चाके व्यवस्थीत चालली की संसाररुपी जीवनाचं रऱ्हाट गाडगं व्यवस्थीत चालण्यास मदत होते. ग्रामीण भागातील महिला आता बचतगटाच्या माध्यमातून कुटुंबातील कर्त्या पुरुषाला अर्थात कुटुंबाच्या अर्थाजनात हातभार लावीत आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध हे गाव. या गावाची ओळख म्हणजे प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून आहे. नवेगावबांध मध्ये डिसेंबर २००३ मध्ये दहा महिलांनी एकत्र येऊन सिध्दार्थ स्वयं सहायता बचतगटाची स्थापना केली. त्या बचतगटाच्या सदस्यांपैकी भिमाबाई शहारे हया एक. शेतीच्या हंगामाशिवाय कामाची वणवा असतांना अशावेळी कोणते काम करावे हा प्रश्न भिमाबाईसह इतर महिलांना भेडसावत असे. भिमाबाई व त्यांच्या बचतगटातील महिला विविध समाजसुधारकांची जयंती वा पुण्यतिथी साजरी करीत असे. या विचारातून त्यांनी डिसेंबर २००३ मध्ये सिध्दार्थ बचतगटाची स्थापना केली.
नवेगावबांधमध्ये कुठले कार्यक्रम घ्यायचे असले तर कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे साहित्य बाहेर गावातून आणावे लागत असे. आपल्या गटाने हे साहित्य खरेदी केल्यास गावामध्येच साहित्य सहजतेने उपलब्ध होईल आणि आपल्या गटाला यापासून उत्पन्नसुद्धा मिळेल या विचाराने गटाच्या बचतीतून आणि मिळालेल्या ५००० रुपयांच्या फिरत्या निधीतून १०० खुर्च्या, गादया आणि स्वयंपाकाची भांडी घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. गावात गटाद्वारे साहित्य उपलब्ध झाल्याने गावकरी आनंदीत आहे. बिछायतच्या व्यवसायातून बचतगटाची झालेली प्रगती पाहता सिध्दार्थ बचतगटाने १ लक्ष ५० हजार रुपये बँकेचे कर्ज घेतले. विविध कार्यक्रमासाठी भाडे देऊन साहित्य घेतल्याने मिळालेल्या उत्पन्नातून बँकेच्या कर्जाची पूर्ण परतफेड करण्यात आली. या व्यवसायामुळे महिलांना गावातच रोजगार सुद्धा मिळत आहे.
महिलांच्या या कामामुळे आणि भिमाबाईच्या पुढाकाराने बचतगटातील महिलांना गावात आज मान मिळत आहे. भिमाबाई तर स्वत: हिशोब करुन गटाचे पूर्ण व्यवहार सांभाळतात आणि इतर बचतगटांना सुध्दा मार्गदर्शन करतात. बचतगटातील सर्व महिला साक्षर आहेत. सिध्दार्थ महिला स्वयंसहायता बचतगटाचा हा चढता आलेख भिमाबाईच्या प्रेरणेने विकासाची नवी पहाट घेऊन आला आहे.