गायींचे संरक्षण करताना महिला सुरक्षेचा देखील विचार करा

0
8

नवी दिल्ली,दि.12– समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या पुन्हा एकदा राज्यसभेत आक्रमक दिसून आल्या. त्यांनी आज राज्यसभेत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत सरकारने या दिशेने ठोस पाऊल उचलण्याचे अपील केले. महिलांच्या सुरक्षेसाठी काही ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. तुम्ही गायींना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहात. पण महिलांवर होत असलेले अत्याचार कमी होताना दिसत नाही. यावर युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
महिलांचा प्रश्न जया बच्चन यांनी उपस्थित केल्यानंतर सभागृहातील अनेक सदस्यांनी बाक वाजवून त्यांना समर्थन दिले. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी चित्रपट अभिनेत्री राहिलेल्या जया बच्चन या ओळखल्या जातात. यापूर्वीही त्यांनी अनेक विषयांवर आक्रमकपणे आपले मत मांडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गो हत्या बंदी कायद्यावरून देशांत मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी संपूर्ण देशभरात गो हत्या बंदी कायदा करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे गायीचे संरक्षण करणाऱ्या गोरक्षकांकडून होत असलेल्या हिंसाचारावर मोठी टीका होताना दिसत आहे. याप्रश्नी आपले मत मांडताना जया बच्चन यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही महत्वाचे असल्याचे केंद्र सरकारला ठणकावून सांगितले.