मुंबई – आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या टप्प्यात 9 राज्यातील 72 मतदारसंघतील मतदानाला सुरूवात झाली आहे. चौथ्या टप्प्यात बिहार 5, महाराष्ट्र 17, मध्यप्रदेश 6, झारखंड 3, ओडिसा 6, उत्तर प्रदेश 13, राजस्थान 13 तर पश्चिम बंगालच्या 8 मतदार संघातील मतदान पार पडत आहे.महाराष्ट्रात नंदुरबार, दिंडोरी, नाशिक, धुळे, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, द. मध्य मुंबई, द. मुंबई, मावळ, शिरुर आणि शिर्डी या 17 मतदार संघतात मतदान पार पडत आहे. सध्या अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत कैद होत आहे.चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील १७ मतदारसंघांतील मतदानासाठी आतापर्यंत मतदारांनी काहीसा निरुत्साह दाखवला आहे. महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत 42.03 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुंबईतल्या ईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून ११६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. २०१४साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी २००९ साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.
ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लीप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला आहे.चरईतील शांती पॅलेस येथे राहणाऱ्या अमृतबेन छाडवा (५८) आणि नानजी छाडवा (६३) या दाम्पत्याला मात्र मतदान यादीत नावच नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही. चरईतील दगडी शाळेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रंही होती. गेल्या ३० वर्षापासूनचे छाडवा कुटूंब चरईत वास्तव्यास आहे. गेल्या २०१४ च्या निवडणूकीत मतदान केलेलं असताना यावेळी मात्र मतदार यादीतील नावच गायब झाल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते.
धुळे – नंदुरबार लोकसभा मतदारसंघात साक्री तालुक्यातील चारणकुडी येथील ग्रामस्थांनी गावाचा पेसा मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
धुळे- भाजपाचे बंडखोर उमेदवार अनिल गोटे यांनी कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजाविला
नाशिक : आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील मतदान केंद्रावर मतदान केले