नक्षल्यांनी केली दोघांची गळा चिरुन हत्या

0
4

गडचिरोली, ता.१: गावात अवैध दारु विक्री करुन पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरुन सशस्त्र नक्षल्यांनी आज मध्यरात्री अहेरी तालुक्यातील दोघांची गळा चिरुन हत्या केली. शैलेश कंगलेवार व सिनू उपाला अशी मृतांची नावे असून, ते देचलीपेठा येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे जण गावात अवैध दारुविक्री करीत होते. यासंदर्भात नक्षल्यांनी त्यांना दोन महिन्यांपूर्वी तंबीही दिली होती. परंतु त्यानंतरही त्यांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला. नक्षल्यांच्या तंबीनंतर हे दोघेही जण पोलिसांच्या संपर्कात होते. त्यामुळे दोघेही नक्षल्यांची माहिती पोलिसांना देतात, असा संशय नक्षल्यांना होता. आज मध्यरात्री सशस्त्र नक्षलवादी देचलीपेठा येथे गेले. त्यांनी दोघांनाही झोपेतून उठवून गावाबाहेर नेले आणि नाल्याजवळ दोघांची गळा चिरुन हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. देचलीपेठा येथे उपपोलिस ठाणे असून, पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी हे कृत्य केल्याने दारुविक्रेत्यांसह नागरिकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे.