नक्षल्यांनी पत्रकांतून एसपीओंना धमकावले

0
9

गडचिरोली,दि.१० – नक्षल्यांनी पोलिस खबऱे व ग्रामपंचायत सदस्यांना धमकावणे सुरु केले असून, अलिकडेच अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात अशी पत्रके आढळून आली आहेत. एसपीओंनी राजीनामे द्यावेत, असा इशारा नक्षल्यांनी दिला आहे.
आम्ही आदिवासींच्या जल, जंगल व जमिनीच्या हक्कासाठी संघर्ष करतो, असा दावा नक्षल्यांनी केला आहे. शिवाय पोलिसांनी नेमलेले एसपीओ(विशेष पोलिस अधिकारी) यांनी आपले काम सोडावे, अन्यथा त्यांचे नरेद्र येर्रावार, शैलेश कारगेलवार व रवींद्र सुनकरी यांच्यासारखे हाल करु, असे नक्षल्यांनी पत्रकांतून धमकावले आहे. यंदा जानेवारी महिन्यापासून नक्षल्यांनी जवळपास आठ जणांची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन हत्या केली आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून धानोरा तालुक्यातील सावरगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत हिडामीटोला येथील एका इसमाचे अपहरण केल्याची अफवा आहे. मात्र पोलिसांनी या बाबीला दुजोरा दिलेला नाही. नक्षल्यांनी यापूर्वी आलापल्लीनजीक टेकमपल्ली परिसरात बॅनर बांधून ग्रामपंचायत सदस्यांना राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. आता त्यांनी एसपीओंना धमकावणे सुरु केल्याने पोलिसांचे खबरे म्हणून काम करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.