सुकाळातील इंदिरा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

0
6

आरमोरी ,दि.६ : पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या सुकाळा येथील इंदिरा प्राथमिक व माध्यमिक आश्मरशाळेत शिक्षण घेत असलेल्या आठव्या वर्गातील सुभाष अनंतराव इष्टाम रा. करैन ता. एटापल्ली या विद्यार्थ्याचा शनिवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूसाठी आश्रमशाळा कर्मचार्‍यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप सुभाषच्या कुटुंबीयांनी तसेच गावकर्‍यांनी केला आहे. याबाबत आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे.
मृतक सुभाष हा २८ सप्टेंबरपासून आजारी होता. सुभाष आजारी असल्याची माहिती त्याच्या गावचा विद्यार्थी सोमजी कोरामी याने शिक्षकांना दिली होती. मात्र याकडे शिक्षक, अधीक्षक, मुख्याध्यापकांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. दोन दिवसात त्याची प्रकृती अधिकच खालावली. तेव्हा दोन शिक्षक व एका चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍याने सुभाषला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार-पाच दिवसांपासून सुभाष तापाने फणफणत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी सुभाषला जीव गमवावा लागला.