गडचिरोलीत पोलीस पाटील भवन उभारणार

0
4

गडचिरोली   दि.10: दुर्गम व नक्षलग्रस्त गावाचा विकास करण्याबरोबरच गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलीस पाटलांनी आजपर्यंत प्रशासनाला सहकार्य केले. पोलीस पाटलाला गावामध्ये आजही मानाचे स्थान असून हा मानसन्मान कायम ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी गावाच्या विकासासाठी स्वत:ला झोकून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
पोलीस मुख्यालयात मंगळवारी जिल्हाभरातील पोलीस पाटलांचे चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रणजितकुमार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्रकाश गेडाम, अनिल करपे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांना मार्गदर्शक ठरू शकेल, यासाठी ‘पोलीस पाटील मार्गदश्रीका’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. सदर पुस्तिका प्रत्येक पोलीस पाटलाला देण्यात आली. या कार्यशाळेला जिल्हाभरातील जवळपास दीड हजार पोलीस पाटील उपस्थित होते.