माविमच्या महिलांनी योजनांची माहिती ग्रामस्थांना द्यावी – मिलींद कंगाली

0
7

माविमचा ४१ वा वर्धापनदिन साजरा

गोंदिया,दि. २५ : महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण भागातील महिलांचे संघटन करुन त्यांना बचतीची सवय लावली. पूढे त्यांच्या स्वावलंबनच्या दृष्टीने त्यांना उद्योग-व्यवसायाकडे वळविले. आर्थिक स्वावलंबनामुळे त्या आता सक्षम होत आहे. माविमच्या महिलांनी आता ग्राम विकासाच्या व लाभार्थ्यांचा योजनांची माहिती ग्रामस्थांना द्यावी. असे मत नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक मिलींद कंगाली यांनी व्यक्त केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहसंमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन श्री कंगाली बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँकेचे जिल्हा समन्वय अधिकारी टि.एम.चिंधालोरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अदानी फाऊंडेशनचे सुबोध सिंग, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक स्वप्नील वडगावकर, सारडा संस्थेचे राज्य समन्वयक एस.आर.केदारी यांची उपस्थिती होती.
कंगाली पुढे म्हणाले, बचतगटांना पतपुरवठा करण्यास बॅकांची उदासीनता दिसून आली. बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या गुणवत्तेवर भर द्यावा. बचतगटांनी आता बाजारपेठेची गरज ओळखून उत्पादन तयार करवे. वनस्पतीपासून सौंदर्य प्रसाधने तयार करुन त्याची बाजारपेठेत विक्री करावी. असा सल्लाही त्यांनी दिला.
चिंधालोरे म्हणाले, बचतगटाचा हिशोब चोखपणे ठेवावा. हिशोब चोखपणे न ठेवल्यास बचतगटांच्या सदस्यांमध्ये भांडणे निर्माण होतात. त्यामुळे चांगल्याप्रकारे चालत असलेला बचतगट बंद होतो. भांडणाचा विपरीत परीणाम सदस्यांच्या आर्थिक विकासावर होतो.
खडसे म्हणाले, केवळ चूल आणि मुल या क्षेत्रापुरताच मर्यादीत महिला आता राहीलेल्या नाही. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतांना दिसत आहे. सावित्रीबाई फुलेचा आदर्श पुढे ठेऊन महिलांची वाटचाल सुरु आहे.

सुबोधसिंग म्हणाले, महिलांमध्ये आत्मविश्वास आहे. हाच आत्मविश्वास त्यांना सन्मानाकडे घेऊन जातो. आर्थिक स्वावलंबनासाठी बचतगट हे महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. महिला बचतगटांनी शिस्तीने काम करावे. बचतगटांनी काही प्रस्ताव अदानी फाऊंडेशनला दिले तर निश्चित मदत करण्यात येईल. बचतगटांनी रोपटयांची नर्सरी तयार केली तर रोपटयांची खरेदी अदानी फाऊंडेशन करेल असे सांगून श्री सिंग म्हणाले, बचतगटांनी अनुदानावर आता अवलंबून राहू नये स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा.
प्रास्ताविकातून माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे म्हणाले, महिलांना सक्षम करण्याचे काम माविम करीत आहे. महिलांची क्षमता बांधणी करण्यात येत आहे. जिल्हयातील सात तालुक्यात ४६० गावांमध्ये ४३७३ स्वयंसहायत बचतगट असून ५३ हजार २४२ महिला बचतगटांच्या सदस्य आहेत. दर महिन्याला ह्या महिला ३७ लाख २६ हजार रुपयांची बचतगटामध्ये बचत करीत आहे. तिरोडा व सालेकसा तालुक्यातील २०० गावांमध्ये माविम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबवित आहे. बचतगटातील महिला वेगवेगळे उपक्रम राबवून सामाजिक कार्यात सहभाग घेत आहे. असे सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हयातील माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, कर्मचारी व सहयोगिनी यांची उपस्थिती होती. यावेळी आशा दखने, हेमलता वासनिक, माया कटरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संचालन सहायक नियंत्रण अधिकारी प्रदीप कुकडकर यांनी केले. आभार सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड यांनी मानले.