विदर्भ राज्य जनतेचीच मागणी-श्रीहरी अणे

0
12

ब्रह्मपुरी : विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी फक्त काहीची मागणी आहे. जनतेची मागणी नाही, असा गैरसमज पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते सर्वदूर पसरवित आहेत. पण तो गैरसमज दूर करुन विदर्भ राज्य निर्माण व्हावे, ही जनतेचीच मागणी आहे, हे विरोध करणार्‍यांनी समजून घ्यावे, अशी स्पष्टोक्ती अँड. श्रीहरी अणे यांनी केली.
ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या ‘मी विदर्भ बोलतोय’ सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भवीर जांबुवंतराव धोटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. वामनराव चटप, अँड. अनिल किलोर, नितीन रोंगे, अँड. मुकेश सर्मथ, किशोरसिंह बैस, अँड. नंदा पराते, सतीश इटकेलवार, प्रमोद बनकर, अँड. विजय खांदेवाले, बंडू धोतरे, अशोक रामटेके, अँड.गोविंद भेंडारकर, सुधील सेलोकर, सुखदेव प्रधान आदी विदर्भलढय़ाच्या विचारपीठावर उपस्थित होते.
अँड. श्रीहरी अणे पुढे म्हणाले, विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी मुंबई व पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते अनेक गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी होत असलेला गैरसमज समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या जंतरमंतर सभेत विदर्भातून तीन हजार महिला उपस्थित होत्या.यापूर्वी जनमंचने मतदान घेतले असता विदर्भातील जनतेने ९0 टक्के मतदान विदर्भाच्या बाजूने केले आहे. मग ही मागणी जनतेची कशी नाही, याचा विचार विरोधकांनी केला पाहिजे. विदर्भ राज्य होणे हा भाषिक वाद नाही. विदर्भात जंगल, जमीन, वीज, पाणी, खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. आपल्या खांद्यावर भार देऊन प. महाराष्ट्र व मुंबई मजा मारीत आहे. नोकर्‍या, सिंचन, निधी हे सर्वप. महाराष्ट्राने पळविले आहे. विदर्भ आर्थिकदृष्टया संपन्न आहे. शेतकर्‍यांविषयी बोलताना म्हणाले की, आपल्या राज्यात शेतकर्‍यांच्या समस्यांना प्राधान्य देण्यात येईल व आत्महत्या होणार नाही. यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले. तर अँड. अनिल किल्लोर, अँड. वामनराव चटप, अँड. नंदा पराते, किशोरसिंह बैस, अशोक रामटेके आदींनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अँड. गोविंद भेंडारकर, परिचय सुधीर सेलोकर, संचालन प्रा. डॉ. युवराज मेश्राम तर आभार प्रधान यांनी मानले.