प्रदूषण करणारे कारखाने, कंपन्यावर कार्यवाही करा – पर्यावरण मंत्री कदम

0
11

प्रदूषण नियंत्रणासाठी आढावा सभा
चंद्रपूर कृती कार्यक्रम राबविणार

चंद्रपूर,दि.15 : प्रदूषण नियंत्रणासाठी वारंवार कारखाने, कंपन्यांना सूचित करण्यात येते, असे असतानाही अनेक कंपन्या शासनाच्या सुचनाकडे दुर्लक्ष करतात. ही बाब वारंवार निर्दशनास आली असून यापुढे असे प्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्यांच्यावर कार्यवाही करा, असे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले.

प्रदूषण रोखण्यासाठी चंद्रपूर कृती आराखडा तयार केला जात असून त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नाना शामकुळे, अनिल धानोरकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सतीश गवई, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, मनपा आयुक्त संजय काकडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पुंडलिक निरासे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.कदम यांनी जिल्ह्यातील उद्योगामुळे होणाऱ्या प्रदूषणाची माहिती घेतली. ज्या अतिप्रदूषण करणाऱ्या उद्योग, कंपन्यांना नोटीस बजावून उपाय योजना करा. कंपन्याकडून तात्काळ प्रतिसाद मिळत नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. प्रसंगी सदोष मनुष्य वधाचा गुन्हेही नोंदवा, असे निर्देश श्री. कदम यांनी दिले.

डब्ल्युसीएल, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, सिमेंट उद्योग आदी उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत श्री. कदम यांनी नाराजी व्यक्त केली. कोळशाची अवैध वाहतूक व साठवणूक होत असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर अशा वाहतुकीवर कार्यवाही करा. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने निलंबीत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रदूषण नियंत्रणाची कार्यवाही येत्या एक महिण्यात करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.