शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढले पाहिजे – अनुपकुमार

0
14

गोंदिया,दि. २४ -:आपल्याकडे जलयुक्त शिवार अंतर्गत मामा तलाव आहेत. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त प्रणित सिंचन विहिरींचा कार्यक्रम सुद्धा राबविला जात आहे. या सर्व योजनांची सांगड घालून कृषी सधनता वाढविण्यावर भर देण्यासह शेतकर्‍यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी कार्य करा, असे आवाहन नागपूर विभागाचे आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
शेजारच्या मध्यप्रदेश राज्याने सिंचन विहिरींचीनिर्मिती करून कृषिक्रांती घडविल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात बुधवारी जिल्हा परिषद विभागप्रमुख, गटविकास अधिकारी व लघूपाटबंधारे विभागाचे अभियंता यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यावेळी उपस्थित होते.
मनरेगा, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र राज्य जिवनोन्नती अभियान, महिला आर्थिकविकास महामंडळ, उमेद, जलयुक्त शिवार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम आदी विविध योजनांचा त्यांनी याप्रसंगी आढावा घेतला. गोंदिया हा मजुरांचा जिल्हा आहे. मनरेगामध्ये गोंदिया जिल्ह्याची कामगिरी चांगली आहे. या योजनेवर अडीचशे ते तीनशे कोटींचा खर्च होतो. त्यामुळे विकासात्मक कामावर भर असायला हवा. प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहे. थोडे प्रयत्न केल्यास राज्यात प्रथम क्रमांकावर येऊ शकतो. त्यादृष्टीने प्रयत्न करा. ‘स्वच्छ भारत मिशन’चा आढावा घेताना ते म्हणाले, शौचालय हे साध्य नाही, ते साधन आहे. लोकांना उघड्यावर बसण्यापासून परावृतत करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने मार्च अखेरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र जिवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांचे सक्षमीकरणावर भर देत चंद्रपूर येथे २ मार्चपासून आयोजित ‘स्वयंसिद्धा’ या कार्यक्रमात बचत गटांना पाठविण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
सिंचन विहीर, मामातलाव व जलसिंचनाचा त्यांनी याप्रसंगी आढावाघेतला. सिंचन विहीर हा मध्यम वित्तीय शेतकर्‍यांचा कार्यक्रम आहे. ही योजना शेतकर्‍यांना आपली वाटली पाहिजे. तलावांचे पूर्नरूज्जीवन करताना त्याचा लाभ शेतकर्‍यांना अधिक होईल, यादृष्टीने कार्य करा. रब्बीच्या पिकांसह फळबागायती व भाजीपाल्यांची लागवड करण्यास शेतकर्‍यांना प्रोत्साहित करा. वन्यप्राण्यांचा त्रास असलेल्या भागात हळदीचे उत्पादन घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो, असेही ते याप्रसंगी म्हणाले. शाळा, अंगणवाडी मधील आधार नोंदणी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत डिजिटल शाळांचा आढावा सुद्धा त्यांनी घेतला. गोंदिया जिल्ह्यात वाचन कट्टे सुद्धासुरू करण्यात आले असल्याबाबत त्यांनी गौरोद्गार काढले.
दरम्यान शासनाच्या सर्वच योजनांमध्ये प्रगती साधण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. बैठकीच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आयुक्त अनुपकुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सभेला प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल. पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजेश देशमुख जे. एम. अंबादे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. डी. निमगडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, कार्यकारी अभियंता एस. एस. पठाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, प्रभारी प्रकल्प संचालक विजय जवंजाळ, मुख्य लेखा व वित्ता अधिकारी अनंता मडावी व सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित होते.