पाणी टंचाई आराखड्यानुसार मंजूर कामे 30 एप्रिलपूर्वी पूर्ण करा- बावनकुळे

0
15

नागपूर दि.२१:: ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पंचायत समितीनिहाय संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून ज्या गावात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होईल, अशा गावांमध्ये आराखड्यानुसार तसेच अतिरिक्त उपाययोजनाद्वारे 30 एप्रिलपूर्वी संपूर्ण कामे पूर्ण करुन पाणीपुरवठा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या खेडकर सभागृहात नागपूर ग्रामीण व हिंगणा तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा व पाणी टंचाई निवार्णार्थ राबविण्यात येणाऱ्या आराखड्यासंदर्भात सरपंच व ग्रामसेवकांची संयुक्त बैठक घेवून आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार समीर मेघे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशाताई सावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद सदस्य रुपराव शिंगणे, श्रीमती शुभांगी गायधने, तसेच पंचायत समिती सदस्य, उपविभागीय महसूल अधिकारी बाबासाहेब कोळेकर, तहसिलदार सुशांत बंदसोडे, गटविकास अधिकारी श्री कोवे आदी उपस्थित होते.
पाणी टंचाई आराखड्यानुसार आवश्यकतेनुसार खाजगी विहीर अधिग्रहण व टँकरद्वारा पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. अशा उपाययोजनासंदर्भात दोन दिवसात प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल. तसेच मंजूर आराखड्यानुसार कामे पूर्ण न करणाऱ्या ग्रामसेवकांच्या सेवापुस्तकात नोंद घेवून दोन वेतनवाढी थांबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
श्री.बावनकुळे म्हणाले की, मंजूर आराखड्यानुसार व अतिरिक्त मंजूर योजनेनुसार ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे अशा गावांसाठी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तत्काळ तयार करुन जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठवावेत. तसेच टँकरद्वारा पाणीपुरवठा आवश्यक असलेल्या गावांचे प्रस्तावही तत्काळ मंजूर करा. पाणी टंचाई निवारणासाठी विहिर खोलीकरण करताना संपूर्ण उन्हाळ्यात पिण्याचे पाणी पुरेल यादृष्टीने खोलीकरणाचे प्रस्ताव तयार करा. तसेच विंधन विहिरी घेताना टंचाई असलेल्या भागाला प्राधान्य द्या.
पाणी टंचाईसंदर्भात तीन टप्प्यात उपाययोजना राबविण्यात येणार असून यामध्ये नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, सार्वजनिक विहीर खोलीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी उपाययोजना राबविण्यात येणार असून या संपूर्ण उपाययोजनाद्वारे 30 जूनपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. प्रस्तावित उपाययोजनानुसार 188 गावांसाठी 352 उपाययोजना मंजूर करण्यात आल्या असून त्यापैकी 135 गावातील 230 उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत.
नागपूर ग्रामीण तसेच शहरा लगतच्या वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी 17 गावात 38 टँकरद्वारा पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये बेसा-बेलतरोडी, गोधनी, बोखारा, बुटीबोरी, सुराबर्डी, शंकरपूर, बोथली, लावा, आदी भागांचा समावेश आहे. बेसा व बेलतरोडी या भागाला अतिरिक्त 10 विंधन विहिरी तसेच 10 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत दिल्या.
श्री. मेघे यांनी हिंगणा तालुक्यातील गावनिहाय कामांचा आढावा घेताना ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. अशा गावांमध्ये प्राधान्याने खाजगी विहिरींचे अधिग्रहण करा अशा सूचना दिल्या. उन्हाळ्यामध्ये कुठल्याही गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही या दृष्टीने सरपंच आणि ग्रामसेवकांनी संयुक्तपणे बसून नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.सरपंच व ग्रामसेवकांनी टंचाई आराखडयानुसार गावात प्रस्तावित असलेली कामे अतिरिक्त नियोजन तसेच पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती संदर्भात बैठकीत माहिती दिली. गटविकास अधिकारी श्री. कोवे यांनी प्रस्ताविकात पाणी टंचाई आराखडया संदर्भात माहिती दिली.