सर्वच गरीबांना हक्काची घरे-पालकमंत्री प्रविण पोटे

0
14

अमरावती,दि.21: राज्यातील प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काची घरे मिळावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी पॅकेज आवास योजना तसेच म्हाडामार्फत विकसीत करण्यात येत असलेली संकुल आदी योजना राज्य शासनाव्दारे राबविण्यात येतात. या योजनांतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित शासकीय विभागांनी उद्दिष्टपूर्ण होईल अशारितेने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात घरकुल योजना, धडक सिंचन विहिरी, अनुकंपाधारकांना नियुक्ती याविषयाबाबत श्री पोटे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, सहायक जिल्हाधिकारी ष्णमुखराजन एन., उपजिल्हाधिकारी श्री काळे यांचेसह शासकीय विभागांचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, प्रत्येक गरीब कुटुंबाला हक्काचे घर मिळावे हे राज्य शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी पॅकेज आवास योजना आदी योजनासह पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनाव्दारे पात्र गरीब लोकांना घरकुलाचे बांधकाम करुन देण्यात येते. जिल्ह्यात सदर योजने अंतर्गत पूर्ण व अपूर्ण घरकुलांच्या सद्यस्थितीबाबतचा आढावा पालकमंत्री महोदयांनी घेतला. अपूर्ण व प्रस्तावित घरकुलांचा गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी संयुक्तपणे पाहणी करुन निधी मागणीचा प्रस्ताव येत्या 10 एप्रिल पर्यंत महसूल विभागास सादर करावे. ज्याठिकाणी जमनीचे भाव जास्त आहे अशा ठिकाणी शासनाच्या ताब्यातील ई क्लास भुखंडाची यादी तर कमी भाव असलेल्या खाजगी मालकीच्या भुखंडाची जिल्हा प्रशासनास सादर करावी. अशा सूचना त्यांनी दिल्या.
राज्यात मोठया प्रमाणात सिंचनाची सोय व्हावी यादृष्टीने धडक सिंचन व मनरेगा योजने अंतर्गत विहिर बांधकामे करण्यात येतात. विहिरींचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनाव्दारे निधीचा वाटप करण्यात आला आहे. जिल्ह्याला दिलेले लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्षपणे दौरे करुन विहिरींच्या सद्यस्थिती बाबत पाहणी करावी. गावातील प्रत्येक लाभार्थ्यांना भेट देऊन योजनेची माहिती द्यावी. अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी यथोचित प्रयत्न करावे, अशा सूचना श्री पोटे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील विविध शासकीय विभागात अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी सुमारे 90 उमेदवारांनी पालकमंत्री महोदयांना निवेदन सादर केली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची नावे संबंधित विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामुहिक यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावीत. यावेळी सर्व शासकीय विभागात रिक्त अनुकंपा पदांचा आढावा त्यांनी घेतला. अनुकंपाधारकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री महोदयांनी दिले. बैठकीला सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.