भंडारा,दि.२८ मे- अस्वलाच्या हल्यात तेंदूपत्ता मजूर ठार झाल्यांच्या घटना सातत्याने जंगल असलेल्या परिसरात घडत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहफूल व तेंदूपत्ता वेचणाऱ्यांना जंगलात प्रवेश देण्यास मज्जाव करावा अथवा त्यांना संरक्षण देण्यात यावे. तसेच पलाडी ते कोका या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात रेतीच्या ट्रकची भरधावये-जा असते त्यामुळे जंगलातील प्राण्यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहेत व त्यांच्या संचारावर परिणाम होते तसेच चांगले रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे सदर रेतीच्या ट्रकची या रस्त्यावरून वाहतुक बंद करण्यात यावे असे निवेदन नवेगाव-नागझिरा-कोका वाइल्डलाइफचे उपसंचालक अमलेन्दू पाठक यांना वाइल्डलाइफ प्रोटेक्शन फोर्स आँफ विदर्भ तर्फे देण्यात आले.निवेदन देतांना वाइल्डलाइफ प्रोटेक्शन फोर्स आँफ विदर्भाचे अध्यक्ष महेंद्र निंबार्ते, नंदकिशोर समरीत, उमेश कठाणे, राकेश भास्कर, दीपक जांभुळकर, महेश निंबार्ते, अमित टीचकुले, निखिल साखरकर, हिमांशु नागपूरे, वेदांत निंबार्ते, निलेश घरडे इत्यादि प्रामुख्याने उपस्थित होते.
मोहफुले वेचणे, तेंदूपत्ता संकलन करणे व यातून आलेल्या रकमेवर आपली उपजिवीका करणे, हे जंगल परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे प्रमुख काम आहे. नवेगाव-नागझिरा-कोका परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. या जंगलात वाघ आणि बिबट्यांचाही अधिवास आहे. आतापर्यंत या पशुंबाबत हल्ला करुन जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने तेंदू हंगाम या मजुरांसाठी पर्वणी असते. तेंदूपत्ता संकलनातून मिळणाऱ्या पैशात पुढील काही महिन्याची जगण्याची तजवीत ते करीत असतात. त्यातून आर्थिक विवंचनाही दूर होते. त्यामुळे शेकडो मजूर दररोज तेंदूपत्ता संकलनाच्या कामात राबत आहेत.तेंदूपत्ता तोडाईसाठी जंगलात जाणाऱ्यांमध्ये लहान मुलांसह घरातील मंडळीचाही सहभाग असतो. भल्या पहाटे जंगलात निघून जायचे आणि सायंकाळी घरी परत यायचे, असा या शेतमजुरांचा दिनक्रम सुरू आहे. यातून आर्थिक मिळकत होत असली तरी वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम मनात ठेऊन त्यांना तेंदूपत्ता संकलन करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सादर मोहफूल व तेंदूपत्ता वेचणाऱ्यांना जंगलात प्रवेश देण्यास मज्जाव करावा अथवा त्यांना आपण संरक्षण देण्यात यावे.
तसेच पलाडी ते कोका या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात रेतीच्या ट्रकची भरधाव ये-जा असते त्यामुळे जंगलातील प्राण्यांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढत व त्यांच्या संचारावर परिणाम होत आहेत तसेच चांगले रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे सदर रेतीच्या ट्रकला या रस्त्यावरून वाहतुकीला मज्जाव करावा. हा रास्ता सायंकाळी ७ ते सकाळी ६ या काळाकरिता पूर्णपणे बंद ठेवावा. केवळ परिसरात वास्तव्य असलेल्या गावातील लोकांना जाण्याची परवानगी द्यावी. याचप्रमाणे एकोडी ते पालोरा या मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक असते भरधाव जाणाऱ्या ट्रकवर कार्यवाही करावी. अन्यथा वन्यजीव प्राणांच्या हितरक्षणाकरिता वाईल्डलाईफ प्रॉटेक्शन फोर्स ऑफ विदर्भातर्फे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले.