नगराध्यक्षपद अवैधतेची उच्च न्यायालयात याचिका

0
13

पवनी,दि.02 : नगर परिषद पवनी सार्वत्रिक निवडणूक २०१६ मध्ये अध्यक्षपदाचे निवडणुकीसाठी पुनम काटेखाये यांनी सादर केलेल्या अर्ज व कागदपत्रात त्रृट्या असल्याने त्यांना अपात्र करण्यात यावे, यासाठी पवनीतील नागरिकांनी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल करून घेतली आहे, अशी माहिती बसपाचे मंडळ समन्वयक जय मेश्राम यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

याचिकाकर्ते डॉ. राजेश नंदुरकर, संजय सावरकर व यादव भोगे यांनी जिल्हा सत्र न्यायाधिशाकडे दाद मागितली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने दाद मागण्यासाठी विलंब झाला, असे कारण देऊन २४ मार्च २०१७ ला याचिका फेटाळली. परंतू न्याय पालिकेवर विश्वास ठेऊन जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार याचिकाकर्त्यांनी केला असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले.अध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावर छानणीनंतर अर्ज स्वीकृत केल्याबाबत निवडणूक अधिकारी स्वीकृत केल्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी, तारीख व शिक्का नाही.

उमेदवाराने द्यावयाचे शपथपत्रावर जात वैधता प्रमाणपत्रावर पावतीचा तपशिल निरंक दाखविला आहे.वित्तीय संस्थेतील शेअर्स निरंक दाखविण्यात आले. शपथपत्रावर अभिसाक्षी म्हणून सही करणे बंधनकारक असताना स्वाक्षरी केलेली नाही. तरीही अर्ज स्वीकृत करून मान्य करण्यात आलेला आहे. नाव बदलाच्या प्रतिज्ञालेखावर कोणत्याही अधिकाऱ्याच्या सह्या नाहीत त्यामुळे प्रतिज्ञालेख अवैध असताना मान्य करण्यात आलेला आहे.नामनिर्देशन अर्ज व अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रातील त्रृटींचा आधार घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली व ती याचिका स्वीकारण्यात आली, अशी माहिती बसपाचे जय मेश्राम, डॉ.राजेश नंदुरकर, अरविंद धारगावे, राजू गणवीर व संजय सावरकर यांनी सांगितले.