‘मुले वाचतील’ तरच ‘मुली वाचणार’-साधना भारती

0
13

गोंदिया,दि.04 : मुलगा व मुलगी किंवा पती व पत्नी हे दुचाकीच्या दोन चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक चाक जरी ढासळले तर गाडी चालू शकत नाही. आज मुले व्यसनाच्या आहारी जाऊन आपले शरीर, मन व जीवनच उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे मुलींचे जीवन नष्ट होत असून मुलांना व्यसनापासून वाचविणे अत्यावश्यक झाले आहे. मुले वाचतील तरच मुली वाचणार, असे प्रतिपादन बेटा बचाव राष्ट्रीय अभियानाच्या ब्रँड अ‍ॅम्बासिडर साधना भारती यांनी केले.
येथील उपविभागीय कार्यालयासमोर आयोजीत (दि.३) बेटा बचाव राष्ट्रीय अभियान कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.याप्रसंगी प्रामुख्याने बेटा बचाव राष्ट्रीय अभियानाचे अध्यक्ष ईश्वर उमरे, प्रवक्ता शिव नागपुरे, मंजू बैरागी,महेंद्र बघेले,माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपूरे,सभापती छाया दसरे,विमल नागपूरे, सरिता वैद्य, सविता बेदरकर, महेंद्र बघेले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना भारती यांनी, आजच्या काळात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्यसनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळते. मात्र शासन व्यसनबंदीकडे दुर्लक्ष करीत आहे. शासन कोणत्याही पक्षाचे असो, व्यसनाशेमुळे समाज व महिलांचा काहीही लाभ होत नाही. व्यसनांमुळे मुलांचा मृत्यू होत असतानाही शासन या विषयावर कठोर पाऊल उचलत नाही. देशात ९० टक्के गुन्हे व्यसनांमुळे होतात. मुली व महिलांवर अत्याचार, बलात्कार, घटस्फोट, विधवा आदी प्रकाराला जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या.बेटा बचाव राष्ट्रीय अभियानाची रूपरेखा स्पष्ट करतांना भारती म्हणाल्या की, अभियानाच्या सुरूवातीला आम्ही महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व उत्तरप्रदेश या चार राज्यात सदर अभियान राबवित आहोत. मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांना व्यसनमुक्ती करण्याबाबत निवेदन देण्यात येईल व सर्वदलीय बैठक संसदेत आमंत्रित करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती याप्रसंगी दिली.