धम्मगिरी बौद्ध धम्माच्या प्रसाराचे केंद्र ठरावे-ना.बडोले

0
20

आमगाव,दि.21 : संपूर्ण मानव कल्याणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला. जगाला तारण्यासाठी बुद्धाच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी धम्मगिरीतून समाजबांधवांचा शैक्षणिक, सांस्कृतीक व धार्मिक विकास साधण्यासाठी तसे कार्यक्रम व उपक्रम राबविले पाहिजे. अशा धार्मिक स्थळांचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाने धम्मगिरी या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले.बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी त्रिपाठक या पाली भाषेतील ग्रंथाचे भाषांतर कार्य राज्य शासनाने सुरु केले आहे. तेव्हा धम्मगिरी हे बौद्ध धम्माच्या प्रसाराचे एक सांस्कृतिक केंद्र ठरावे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
येथील धम्मगिरी परिसरात लुंबिनी वन पर्यटन समितीच्यावतीने आयोजित आंतरराज्यीय बौद्ध धम्म संमेलन धम्मपरिचर्चा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व सत्कारमुर्ती म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूरचे अशोक सरस्वती होते. मार्गदर्शक म्हणून नागपूरचे प्रा.घनश्याम धाबर्डे, बनवणे, तनूजा झिलपे, दिल्लीचे सुनील रामटेके तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, आर.एन. रावते, मनोहर कोटांगले, भरत वाघमारे, ललीतकुमार खोब्रागडे, बी.जी. बुलाखे, फटिंग आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सरस्वती यांनी, बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा धम्म असून त्याचा प्रसार व प्रचार नि:स्वार्थ भावनेतून करण्याची गरज आहे. त्यासाठी अनेक संघटनांद्वारे होत असलेले कार्य पूर्ण संघटनांच्या समन्वयातून केल्यास मजबूत व यशस्वी संघटन निर्माण करता येईल असे मत व्यक्त केले. समारोप कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप बन्सोड होते. प्रमुख पाहुणे डॉ. मोहनलाल पाटील, रेशम भोयर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, यादव मेश्राम, पंचायत समिती सभापती वंदना बोरकर, पंचायत समिती सदस्य छबू उके आदी उपस्थित होते.