वैनगंगा शुद्धिकरणात राज्य शासन उदासीन

0
8

भंडारा,दि.16 : जिल्ह्याची जीवनदायीनी असलेली वैनगंगा नदी अशुद्ध झालेली आहे. तिच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासन उदासीन असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केला आहे.यासंदर्भात नाग नदीचे सांडपाणी वैनगंगा नदीत थांबविण्याबाबत कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, सेवादलचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, अजय गडकरी, मुकूंद साखरकर, प्रशांत देशकर, शंकर तेलमासरे, मनोहर उरकुडकर, अमर रगडे, शंकर राऊत, आवेश पटेल, धनराज साठवणे, भूषण टेंभुर्णे आदी उपस्थित होते.
गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागनदीचे दूषित पाणी वैनगंगा नदीच्या पात्रात विलिन होत आहे. तेच पाणी वैनगंगा काठावरील वसलेल्या गावामध्ये पिण्यासाठी वापरले जात असल्याने मानवी आरोग्यावर गंभीर परिणामी होताना दिसत आहे. सदर विषयावर त्वरीत तोडगा काढावा अन्यथा वैनगंगा नदी बचावकरिता जिल्ह्यातील जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात जनहित याचिका दाखल केली होती. त्याअनुषंगाने न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०१५ रोजी आदेश पारित करून पाणी दूषित करणाºया सर्व यंत्रणेला वैनगंगा नदीत येणारे सांडपाणी शुद्ध करून सोडण्याचे आदेश निर्गमित केले होते. परंतु अद्याप यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
नागपूर महानगर पालिकेने सदर प्रदूषित सांडपाणी शुद्ध करण्याकरिता प्रकल्प उभारणार असल्याचे सांगितले होते. तसेच केंद्र शासनाच्या एनआरसीपी अंतर्गत मंजुरी प्राप्त झाल्यानंतर प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार होती. परंतु प्रकल्प मंजुर केव्हा होईल व अंमलबजावणीसाठी किती कालावधी लागेल या प्रश्नांचे उत्तर अनुत्तरीत आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी स्विकारले.