मौदा,(प्रा.शैलेष रोशनखेडे) दि.10ः- औद्योगिकीकरणामुळे मौदा नगराची लोकसंख्या सुमारे 20 हजारावर झाली असून तालुका मुख्यालय असल्याने प्रत्येक नागरिकाचा संपर्क येतो.त्यातच नगरातूनच राष्ट्रीय महामार्ग क्र.6 जात असल्याने सुसज्ज अशा रुग्णालयाची गरज होती.ती गरज सुध्दा ग्रामीण रुग्णालयाच्या रुपात इमारत तयार करुन पुर्ण करण्यात आली.रुग्णालयाची इमारत पुर्ण करण्यात आली,मात्र रुग्णावंर उपचार करणारे जे वैद्यकिय अधिकारी पाहिजे तेच नसल्याने रुग्णांवर उपचार होत नाही.त्यातच ज्या सोयीसुविधा या रुग्णालयात द्यायल्या हव्या होत्या.त्या सुध्दा दिसून येत नसल्याने रुग्णालयाचे बेहाल झाले आहे.
अडीच वर्षापुर्वी ग्रामीण रूग्णालयाची इमारत तयार झाली.मात्र जनता अद्यापही ग्रामीण रूग्णालयापासून मिळणाऱ्या आरोग्य सुविधेपासून वंचित आहे. आवशक यंत्रसामग्री व 2 – 3 डॉक्टरांव्यतीरिक्त इतर पदभरती न केल्यामुळे ही वास्तु शोभेची बनली आहे. मौदा व परीसरामध्ये अद्यावत सोईयुक्त दवाखाना नसल्याने गंभीर आजार किंवा महत्वाच्या घटनेच्या वेळी रूग्णांना नागपूर किंवा भंडारा येथे हलवावे लागते. प्रवासादरम्यान गंभीर परीस्थितीतील अनेक रूग्णांनी आपले प्राण सुद्धा गमवावे लागले आहे. ग्रामीण रूग्णालय बांधल्या गेल्याने तालुक्यातील जनतेच्या आशा उंचावल्या होत्या. परंतु इमारत उभी होऊनही पुर्ण सेवा मिळत नसल्याने जनतेचा भ्रमनिराश झाला आहे. या ग्रामीण रूग्णालयातून आरोग्य सेवेचा लाभ कधी मिळतो याची जनता आतुरतेने वाट पाहत आहे. तालुक्यामध्ये इतर विकास कामांकरीता भरघोष निधी दिला जात आहे. मात्र आरोग्यासारख्या अत्यंत महत्वपुर्ण सेवेची यंत्रसामुग्री खरेदी करायला शासनाकडे पैसा नाही काय असा जनतेला प्रश्न पडला आहे. एखाद दुसरे विकास काम नाही झाले तरी चालेल परंतु जनतेच्या आरोग्याशी खेळ बरा नाही असे जनतेचे मत आहे. शासन कोणाच्या मरणाची वाट पाहत आहे ? असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. ग्रामीण रूग्णालयाचे घोळे नेमके कुठे अडले आहे ? याचा जाब लोकप्रतिनिधि देतील काय.