सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा १ मे रोजी होणाऱ्या ‘महाश्रमदान’मध्ये सहभागी व्हा-रमेश काळे

0
27

वाशिम, दि. २५ : पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत यंदा कारंजा लाड व मंगरूळपीर तालुक्यातील १२० गावांनी सहभाग घेतला आहे. या गावांमध्ये श्रमदानातून जलसंधारणाची कामे सुरु झाली आहेत. या कामामध्ये शहरातील लोकांचा सहभाग मिळावा, त्यांनाही गावकऱ्यांसोबत श्रमदान करण्याची संधी मिळावी, यासाठी १ मे २०१९ रोजी पानी फाउंडेशनच्या वतीने मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री खुर्द व कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार येथे ‘महाश्रमदान’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी यांनी या महाश्रमदानामध्ये सहभागी होवून गाव पाणीदार करण्यासाठी झटणाऱ्या गावकऱ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन वाशिम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असल्याचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सांगितले.

‘महाश्रमदान’च्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालये यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, पानी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे यांच्यासह विविध संघटना, संस्थांचे पदाधिकारी, शाळा, महाविद्यालाचे शिक्षक उपस्थित होते.

श्री. काळे म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील गावकऱ्यांचा उत्साह वाढावा, त्यांना स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः शहरी भागातील नागरिकांनी महाश्रमदान उपक्रमात सहभागी होवून जलसंधारणाच्या कामामध्ये आपले योगदान द्यावे. याकरिता स्वयंसेवी संस्था, संघटना यांनी पुढाकार घ्यावा. तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या संघटना, राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी. चे विद्यार्थी यांच्यासह सर्व शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षक व विद्यार्थी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. नानावटे यांनी यावेळी पानी फाउंडेशनमार्फत आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची माहिती उपस्थितांना दिली. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच गावांमध्ये सध्या श्रमदान सुरु आहे. १ मे रोजी होणाऱ्या महाश्रमदान उपक्रमासाठी पिंप्री खुर्द व उंबर्डा बाजार या गावांची निवड करण्यात आली आहे. याठिकाणी १ मे रोजी सकाळी ६ ते १० वा.पर्यंत व सायंकाळी ५ ते ८ वा. पर्यंतच्या कालावधीत दोन टप्प्यात महाश्रमदान होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.