वलगावातील अग्नीकांड पिडीतांचे आ.यशोमती ठाकूरांनी केले सांत्वन

0
12

अमरावती,दि.20 : जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील वलगाव येथील पुनर्वसन लोकवस्तीला रविवारला सकाळी लागलेल्या आगीत 85 घरे जळून खाक झाली.या घटनेची माहिती मिळताच तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट देत पिडीत कुटुबियांचे सांत्वन केले.तसेच ३७ कुटुंबीयांना तातडीने सानुग्रह अनुदान द्यावे, त्यांची जेवणाची सोय करावी, अशा सूचना त्यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना दिल्या.ही आग विझविण्यासाठी अग्नीशामक विभागाला तीन तास लागले.यामध्ये बडनेरा,अचलपूर येथील अग्निशमन विभागाचा समावेश होता.

पुनर्वसनाबाबत प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. वलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत ३७ कुटुंबांना तात्पुरते आश्रय दिले आहे. यावेळी दोन दिवस त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सोमवारी प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावेळी नायब तहसीलदार दिनेश बढीये, मंडळ अधिकारी व्ही. एम साव, तलाठी एन. एम. वाकोडे, वलगावच्या सरपंच मोहिनी मोहोड, प्रहारचे वसू महाराज, वलगावचे ठाणेदार मोहन कदम उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी उद्यसिंह राजपूत, गटविकास अधिकारी डी. बोरखडे आदींनी घटनास्थळाला भेट दिली.
या परिवारांना वाढीव अनुदान मिळावे, याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितले. घरे बांधणीकरिता सारडा यांच्या शेतीचे प्रकरण न्यायालयाने निकाली काढले आहे. लवकरच तेथे पुनर्वसनग्रस्तांना भूखंड मिळणार आहेत. आगग्रस्तांना शासनाची सर्व मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही आ. यशोमती ठाकूर यांनी आगग्रस्तांना धीर देताना स्पष्ट केले.
येथे वीज वितरणाच्या विद्युत खांबावरील तारा लोंबकळत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. राजकन्या अशोक वानखडे यांनीही तार लोंबकळत असल्याची तक्रार नोंदविली होती. मात्र, वीज वितरणने दुर्लक्ष केले. अखेर तारांमधील घर्षणाने रविवारी आगडोंब उठल्यामुळे ३७ घरांना झळ बसली. याला वीज वितरणाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप होत आहे