गोंडवाना विद्यापिठाचा चौथा वर्धापनदिन
गडचिरोली, दि.२-विद्यापिठ हे केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता ते नाविन्य आणि संशोधनाचे ठिकाण ठरणे गरजेचे आहे. प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ते येथील गोंडवाना विद्यापिठाच्या चौथ्या स्थापना दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ना. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे होते. कार्यक्रमास खासदार अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत तसेच कुलसचिव डॉ. विनायक इरपाते उपस्थित होते.
विद्यापीठाच्या स्थापनेसाठी चंद्रपूर की गडचिरोली असा विचार असताना मनातील द्वंद् बाजूला सारून आपण गडचिरोलीला प्राधान्य दिले असे सांगत ना. मुनगंटीवार यांनी विधानसभेत या विद्यापीठ स्थापनेसाठी केलेल्या संसदीय संघर्षाची आठवण याप्रसंगी सांगितली. विद्यापीठाला वाढीव जागा लागणार आहे त्यासाठी लगतच्या एमआयडीसी सह खाजगी जागांच्या मालकांशी चर्चा करून ती जमीन खरेदी करण्याची शासनाची तयारी आहे. विद्यापीठ स्थापनेत गडचिरोलीचे माजी पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील आणि तत्कालीन उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी सहकार्याची आणि सकारात्मक भुमिका ठेवली होती. याचीही आठवण त्यांनी आपल्या भाषणात केली.
विदर्भ विकासाचा अनुशेष भरून निघावा यासाठी गडचिरोली-मुल-चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. सोबतच येणा-या काळात सिरोंचा ते भामरागड हा मार्ग देखील राष्ट्रीय महामार्ग करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.शहरामध्ये एक सुसज्ज नाटयगृहाचे बांधकाम करण्यात असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.