अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया ५ जूनपासून

0
10

नागपूर दि.४-: राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ५ जूनपासून याला प्रारंभ होणार आहे. राज्यभरातील महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया ‘कॅप’ मार्फत राबवली जाईल. मोठ्या प्रमाणावर रिक्त राहणाऱ्या जागा भरण्याचे मोठे आव्हान यंदा महाविद्यालयांसमोर आहे. बारावीच्या परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांत एकूण ५० टक्क्यांच्या वर गुण मिळालेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल.

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १८ जून आहे. यंदा बारावीच्या निकालात वाढ झाल्यामुळे नामवंत महाविद्यालयांत प्रवेशासाठी जोरदार चुरस दिसून येण्याची चिन्हे आहेत.
‘जेईई-मेन्स’ आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक व प्रवेशप्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांकडून सातत्याने विचारणा होत होती. अखेर बुधवारी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेशप्रक्रियेसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली. यंदादेखील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही आॅनलाईन असेल. ‘आॅनलाईन’ अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची पडताळणी करायला ‘एआरसी’मध्ये (अप्लिकेशन रिसिप्ट सेंटर) जाणे यंदा आवश्यक ठेवण्यात आलेले नाही.

कशी असेल प्रक्रिया?
अभियांत्रिकीच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा तीन प्रवेश फेऱ्या असतील. पहिल्या, दुसऱ्या फेरीसाठीच्या अर्जात पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली आहे. अखेरच्या फेरीत मात्र ‘कौन्सिलिंग’द्वारे प्रक्रिया राबविली जाईल. पहिल्या व दुसऱ्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीतच प्रवेश घ्यावा लागेल. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर पहिली प्राथमिक यादी २१ जून तर अंतिम यादी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे,बारावीची गुणपत्रिका,शाळा सोडल्याचा दाखला,जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र,अधिवास प्रमाणपत्र