गडचिरोली –डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती समारोह समिती आलापल्ली तर्फे स्थानिक क्लबग्राउंडवर महात्मा जोतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त अभिवादन आणि ओ.बी.सी समाजाकरिता समर्पित प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वातंत्र्य प्राप्तीच्या ६५ वर्षानंतरची झालेली ओ.बी.सी समाजाची दशा आणि दिशा या परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून डॉ. समीर कदम, अध्यक्ष स्थानी उप वनसंरक्षक आलापल्ली हेमंत कुमार मीना, प्रमुख अतिथी म्हणून सह उप वनसंरक्षक डि. आय. तिरपुडे, सह उपवनसंरक्षक हरीश वाघमोडे, पोलीस निरीक्षक संजय मोरे, आलापल्ली ग्रामपंचायत उपसरपंच पुष्पा अलोणे, जिल्हा परिषद सदस्य लैजा यालुरकर, प्राचार्य गजानन लोनवले,प्राचार्य बर्डे, मिलिंद खोडे, जिल्हा परिषद सदस्य नंदा दुर्गे, पोलीस उप निरीक्षक सोलंकी, लक्ष्मण मोहुर्ले, श्रीनिवास निकोडे आदि उपस्थित होते.
महात्मा फुले आणि आंबेडकरांना अभिवादन करून डॉ. समीर कदम यांनी स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतर झालेली ओबीसी समाजाची दशा आणि दिशा यावर मार्गदर्शन केले. भारतात सर्वात जास्त संख्येने असलेला ओ.बी.सी समाज एकजूट नसल्यामुळे आज त्यांची अशी परिस्थिती आहे, त्यामुळे ओबीसी बांधवांनी संघटीत होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलावा. राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाचा वापर नुसता व्होटबँक म्हणून केला, मात्र ओबीसींना कोणत्याही राजकीय पक्षांनी न्याय दिला नसल्याचं ते बोलले. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. सर्वात जास्त ओबीसी शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही, उत्पन्न नाही, बेभरवश्याचे हवामान यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. ओ.बी.सी आरक्षण, संविधान, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित सर्व अतिथींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती समिती तर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच पुष्पा अलोपे यांनी तर संचालन व आभार आनंद अलोपे यांनी केलं.तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात अल्पसंख्याक वर्ग आणि अनुसूचित जमाती यांना समर्पित विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बुद्धिष्ट लिटरसी अंडर एजुकेशन संघ तथा समारोह समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.