राज्यात 2 ऑक्टोबरपासून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना

0
12

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125 व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त शासनाचा निर्णय

मुंबई, दि. 11 : राज्यात दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील
कुटुंबांना गंभीर व खर्चिक आजारांवरील मोफत उपचार देण्यासाठी महात्मा
ज्योतिबा फुले यांच्या 125व्या पुण्यतिथी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा
फुले जीवनदायी आरोग्य योजना 2 ऑक्टोबर, 2016 पासून राबविण्यास मान्यता
देण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेली जीवनदायी आरोग्य योजना 1
ऑक्टोबर 2016 रोजी संपुष्टात येणार आहे. या योजनेसंदर्भात नुकताच शासन
निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना व
अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका धारक व दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिका
धारक (1 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंबे) तसेच औरंगाबाद व
अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण चौदा
शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबे
लाभार्थी असतील. या व्यतिरिक्त शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, महिला
आश्रमातील महिला, अनाथालये, वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिक तसेच
अधिस्वीकृती धारक पत्रकार व त्यांच्या वर अवलंबून असणारी कुटुंबे यांचाही
लाभार्थी घटकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी आधार
कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालक परवाना तसेच चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त
जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबासाठी त्यांच्याकडे असलेली शुभ्र शिधापत्रिका
अथवा सातबारा उताऱ्याच्या आधारे ओळखपत्र म्हणून उपयोग करता येईल.
योजनेंतर्गत समाविष्ट उपचार पध्दतीवरील उपचारासाठी एक किंवा सर्व
सदस्यांसाठी वार्षिक विमा संरक्षण रक्कम प्रति कुटुंब रुपये दोन लाख एवढी
असेल. तसेच मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रति कुटुंब तीन लाख
रुपये असेल. यामध्ये दात्याच्या शस्त्रक्रियेचा समावेश असेल.

योजनेमध्ये पूर्वीच्या 971 वैद्यकीय प्रक्रियांपैकी अत्यंत कमी वापर
असलेल्या प्रक्रिया वगळण्यात आल्या असून काही नवीन प्रक्रियांचा समावेश
करण्यात आला आहे. तसेच कर्करोग, बालक व वृध्दांवरील उपचार, सिकलसेल,
ॲनिमीया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदींसाठी नवीन उपचारांचा समावेश करुन
रक्तविकार शास्त्र या विशेषज्ञ सेवेसह 31 विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 1100
प्रक्रियांचा समावेश या योजनेत करण्यात येत असून त्यामध्ये 127 पाठपुरावा
सेवांचा समावेश असेल. तसेच 111 प्रक्रिया शासकीय रुग्णालयांसाठी तसेच
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये यांच्याकरिता राखीव ठेवण्यात
आले आहे.

या योजनेची अंमलबजावणी सध्या अस्तित्वात असलेल्या जीवनदायी आरोग्य योजना
सोसायटीमार्फत केली जाईल. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक
उपक्रमातील विमा कंपन्यांकडून निविदा मागवून त्यातील पात्र विमा कंपनीची
निवड करण्यात येणार आहे. तसेच टीपीए कंपन्यांमार्फत अंगीकृत
रुग्णालयांमध्ये आरोग्यमित्राची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचे
नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी, जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी
यांच्याकडे राहणार आहे. त्यानुसार विमा कंपनीने प्रत्येक अंगीकृत
रुग्णालयात पूर्णवेळ आरोग्य मित्र नियुक्त करणे आवश्यक राहणार आहे.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वी कॉल सेंटरची स्थापना करण्यात आलेली
आहे. हे कॉल सेंटर्स प्रभावीपणे कार्यन्वित ठेवण्यासाठी त्यामध्ये आवश्यक
सुविधा करणे तसेच देखभाल व दुरुस्ती करणे इ. बाबींची जबाबदारी विमा
कंपनीकडे राहणार आहे.