भाजप सरकार निव्वळ घोषणाबाज-खा.अशोक चव्हाण यांची टीका

0
7

गडचिरोली,दि.२६: निवडणुकीपूर्वी खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेले केंद्र व राज्यातील भाजप सरकार निव्वळ घोषणाबाज असून, या सरकारने काेणतीही नावीन्यपूर्ण कामगिरी केली नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी आज चामोर्शी येथे केली.
नगर पंचायत निवडणुकीत उभे असलेल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ स्थानिक वाळवंटी चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसचे विधिमंडळातील उपनेते आ.विजय वडेट्टीवार, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार दीपक आत्राम, सगुणा तलांडी, हसन गिलानी उपस्थित होते. मंचावर माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांची उपस्थिती नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती.
खा.अशोक चव्हाण पुढे म्हणाले, ज्या योजना काँग्रेस सरकारने सुरु केल्या होत्या, त्यांचीच नावे बदलून लोकांची दिशाभूल केली जात आहे. काही चांगल्या योजना बंद करुन भाजप सरकारने लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. आपण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. परंतु प्रचंड दुष्काळ असताना या सरकारने कर्जमाफी केली नाही. त्यामुळे हे सरकार शेतकरीविरोधी आहे, असा आरोप खा.चव्हाण यांनी केला. काँग्रेस सरकारच्या काळात गडचिरोली जिल्हयाच्या विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. परंतु भाजप सरकारने काहीही केले नाही, अशी टीका करुन विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन खा.चव्हाण यांनी केले.
यावेळी आ.विजय वडेट्टीवार यांनी भाजप-सेना सरकारवर घणाघाती प्रहार केले. हे लोक आमच्यावर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करीत होते. आता तेच भ्रष्टाचार करीत आहेत. अनेक भ्रष्टाचारांची चौकशी थांबविण्यात आली आहे. याप्रसंगी माजी खा. मारोतराव कोवासे, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी यांचीही भाषणे झाली.