मुंबई-विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस होणाऱ्या सरकारच्या चहापानावर सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्याची घोषणा आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केली. गेल्या वर्षीच्या दुष्काळग्रस्तांना अजूनही मदत मिळालेली नाही. गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसाचे अजून पंचनामेही झालेले नाहीत. राज्यात २३ हजार गावे दुष्काळपीडित आहेत. गेल्या तीन महिन्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आतापर्यंतच्या सर्वाधिक झाल्या आहेत. दुसऱ्या बाजूला राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांची सुरक्षा, पुरोगामी कार्यकर्त्यांना धमकी आणि पानसरे यांचे मारेकरी न मिळणे अशा सर्व स्तरांवर सरकार अपयशी ठरल्याची टीका मुंडे यांनी केली. महाराष्ट्राच्या हक्काचे पिंजाळ आणि दमनगंगा खोऱ्यातील पाणी गुजरातला पळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वाइन फ्लूसारखा जीवघेणा आजार सरकारने गंभीरतेने घेतलेला नाही. स्वाइन फ्लूची औषधे बाजारात मिळत नाहीत. त्यांचा काळाबाजार सुरू झाला आहे. आजार आटोक्यात आणण्यातही सरकारला अपयश आलेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या चहापानात काहीच रस नसल्याचे या वेळी धनजंय मुंडे यांनी यांनी या वेळी स्पष्ट केले.यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.